पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमधील प्रभावी अन्य मागासवर्गीय नेते उपेंद कुशवाह यांनी नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचा त्याग केला आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नवा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय लोक जनता दल असेल असेल. त्यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.
नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी सोमवारी घोषित केला. गेल्या 18 वर्षांमध्ये त्यांनी 3 वेळा नितीश कुमारांना सोडले आहे. त्यांच्या नवा पक्ष भारतीय जनता पक्षाशी सहकार्य करण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर आपला प्रारंभ चांगला झाला. तथापि, शेवट मात्र वाईट झाला. मी माझी विचारसरणी गमावून धन कमावण्याचा विचार करु शकत नाही. नितीश कुमार ज्या मार्गाने चालले आहेत, तो त्यांच्या पक्षासाठी अयोग्य आहे. ते शेजाऱयाच्या घरात आपला वारसदार शोधत आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या तेजस्वी यादव यांच्यावर शरसंधान केले. बिहारमध्ये 2025 ची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढविली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डिसेंबरमध्ये केली होती. तेव्हापासूनच कुशवाह आणि त्यांच्यातील मतक्षेद चव्हाटय़ावर आले होते. नितीशकुमार यांनी स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाला गहाण ठेवले आहे, अशी जहाल टीका त्यांनी यावेळी केली.
निर्णय क्षमताही गमावली नितीश कुमार प्रारंभीं स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेत होते. इतर नेते आणि तळागाळातील कार्यकर्ते यांना विश्वासात घेत होते. पण आता ते त्यांच्या इच्छेनुसार काहीही करु शकत नाहीत. त्यांनी आपली निर्णयक्षमता पक्षाबाहेरील काही लोकांकडे गहाण टाकली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.