शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे मत : गडहिंग्लज येथील सुभाष धुमे प्रतिष्ठानतर्फे मनीषा सुभेदार यांना पुरस्कार
प्रतिनिधी /कोल्हापूर
दबावग्रस्त आणि अभावग्रस्त असा आपला भवताल असतानासुद्धा मूल्याधिष्ठीत पत्रकारिता करणारे पत्रकार आजही आहेत. समाजातील वास्तव समोर आणून जागल्याची, प्रेरकाची भूमिका पत्रकार बजावू शकतात, असे विचार शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज येथील सुभाष धुमे प्रतिष्ठानतर्फे आयोजित महिला पत्रकार पुरस्कार वितरण सोहळय़ात ते बोलत होते. कोल्हापूरनजीकच्या उचगाव येथील समर्थ माध्यमिक शाळेत हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप्ड संस्थेचे अध्यक्ष पी. डी. देशपांडे होते. याप्रसंगी बेळगाव तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार, लोकमतच्या इंदुमती गणेश, मुक्त पत्रकार सविता नाबर यांना सुभाष धुमे प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, पुस्तक, मानपत्र, पाच हजार रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते.
डॉ. हिर्डेकर म्हणाले, सुभाष धुमे यांनी आजच्या सतत बदलणाऱया पत्रकारितेच्या क्षेत्रातही आपला विवेक जागा ठेवला आहे. ब्रेकिंग न्यूजऐवजी मेकिंग न्यूजवर त्यांनी नेहमी भर दिला आहे. पत्रकारांवर आज अनेक दबाव आहेत. परंतु त्याला झुगारूनही पत्रकारिता करणारे पत्रकार पुरस्कारासाठी पात्र ठरतात. पत्रकार हे त्या वृत्तपत्राचा चेहरा असतात हे त्यांनी लक्षात ठेवावे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकार मनीषा सुभेदार म्हणाल्या, सीमाभागात मराठी पत्रकारिता करणे अवघड असतानाही तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचा वारसा पुढे नेणे ही आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो. लिखाणाचे स्वातंत्र्य असल्याने अनेक प्रश्नांना वाचा फोडणे शक्य झाले असून मूल्याधिष्ठीत पत्रकारिता नेहमीच समाजासाठी पोषक ठरली आहे. पत्रकार लेखन करत असला तरी सर्वांच्या सहकार्याशिवाय तो पुढे जात नाही. त्यामुळे हा पुरस्कार ‘तरुण भारत’ परिवाराचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून पी. डी. देशपांडे म्हणाले, आज सावित्रीच्या तीन लेकींचा सन्मान पाहून अतिशय आनंद होतोय. या तिन्ही पत्रकारांचे काम समाजाला दिशा देणारे असल्याने भावी पिढीसमोर या रोल मॉडेल ठराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी इंदुमती व सविता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना प्रति÷ानचे अध्यक्ष सुभाष धुमे यांनी राजकारण आणि गुन्हेगारी या पलिकडेही पत्रकारिता आहे. आणि पत्रकारितेकडून परिवर्तनाची अपेक्षा आहे, असे सांगितले. अर्ज आणि शिफारस या पलिकडे कार्य पाहूनच पुरस्कार दिले जातात, हे त्यांनी स्पष्ट केले. मुग्धा गोरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी समर्थ माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.