शक्तिपीठ असलेल्या देवींचा वास हा उंच गडांवर आहे आणि त्या उग्रस्वरूपात आहेत. असुरांशी लढण्यासाठी म्हणून त्या प्रकट झाल्या असल्यामुळे त्यांच्या हातात शस्त्रे आहेत. मुद्रा तेजस्वी व शत्रूला भय वाटावे अशी आहे. अपवाद आहे ती श्री लक्ष्मी देवी. लक्ष्मीची मूर्ती ही हसरी आणि रूपसंपन्न आणि सर्वाभरणभूषित आहे. तिच्या हातात कमळ, अमृतघट, श्रीफळ, शंख असतो. काही मूर्तींमध्ये ती आपल्या हाताने संपत्तीचा वर्षाव करते. तिची कांती सुवर्णाची आहे. तिच्याजवळ हत्ती आहेत. बिल्ववृक्ष हा तिचा आवडता आहे. लक्ष्मीच्या हातात असलेले श्रीफळ हे नारळ नसून बिल्वफळ आहे. बंगालमध्ये देवीच्या नवरात्रीची सुरुवात ही ‘बोधन’ या विधीने होते. हा विधी बेलवृक्षावर करतात. ‘बोधन’याचा अर्थ आवाहन. श्री लक्ष्मी ही शिवाची उपासना करताना शिवमय झाली व त्यातून बिल्व वृक्ष उगवला अशी कथा आहे.
बिल्वपत्राच्या त्रिदळात डावे पान ब्रह्मदेवाचे, उजवे विष्णूचे आणि मधले शिवपार्वतीचे मानतात. या वृक्षावर लक्ष्मीचा वास असल्यामुळे तो दारिद्र्य़नाशक आणि इच्छापूर्ती करणारा आहे, असे मानतात. लक्ष्मी ही शांत आहे. तिच्याजवळ असलेल्या सगळय़ा वस्तू ह्या प्रसन्नदायी आहेत. अशी लक्ष्मी सर्व सर्वांना प्रिय आहे. तिची दृष्टी पडून जीवन सुसंपन्न, कृतार्थ व्हावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. लक्ष्मी ही कलियुगात सर्वत्र फार पूज्य आहे म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘रामदास म्हणे कळी माजी पूज्य भूमंडळी’।
लक्ष्मी ही समुद्रमंथनातून वर आली तेव्हा तिचे रूपलावण्य बघून देव, असुर, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळे तिच्यावर भाळले. ती हातात हार घेऊन स्वयंवरासाठी सिद्ध झाली. परंतु तिला कोणीही पसंत पडेना. फक्त नारायण अर्थात विष्णू तिला आवडले. परंतु विष्णुंजवळ विरक्ती असल्यामुळे त्यांनी तिच्याकडे बघितले नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘हे असो महासिद्धीसी लक्ष्मी ही आलिया पाशी। परी महाविष्णू जैसी गणीचीना ते’। अष्टमहासिद्धींसह लक्ष्मी जवळ आली तरी देखील महाविष्णूने जसे तिला मोजलेच नाही. नंतर लक्ष्मी विष्णूंच्या पायांपाशी स्थिर होऊन विष्णुपत्नी झाली. श्रीसूक्तममध्ये म्हटलेले आहे, माझ्या घरी येणारी लक्ष्मी ही ‘विष्णु मनोनुकुले’ असायला हवी. जगाचे संरक्षक, पालनकर्ते, पिता असलेल्या विष्णूंच्या मनानुकूल लक्ष्मी घरात असावी. ती माझ्या मनाप्रमाणे येणारी नसावी अशी सूचना ऋषींनी दिली आहे कारण लक्ष्मी मुळात चंचल नाही तर लक्ष्मीवान चंचल असतो, असे पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात. लक्ष्मी घरात आली की इच्छापूर्तींची एक यादीच मनात तयार होते आणि लक्ष्मी बाहेर जाते. देवांच्या चरणांकडे जिचे कायम लक्ष आहे ती लक्ष्मी विविध रूपाने नटलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेला रात्री लक्ष्मीपूजन करून जागरण करतात. त्या दिवशी अंतराळात विहार करणारी लक्ष्मी,‘ कोण जागे आहे’? हा प्रश्न विचारत घरी येते. तिला बाह्यजागृती अपेक्षित नाही तर कोण अंतर्यामी जागे आहे? या शोधात ती असते. जागृतीचे वैभव ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ ती स्थिरावते. तिला ‘आत्मलक्ष्मी’ असे म्हणतात. माणसाजवळ आत्मा असणे ही त्याची सर्वात मूल्यवान संपत्ती आहे. परंतु त्याचा त्याला विसर पडतो. तो संपत्ती, घरदार, पैसे, सोने यातच लक्ष्मीला मोजतो. लक्ष्मीचे एक रूप तनलक्ष्मीचे आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ अशी दिव्यापाशी आपण रोजच प्रार्थना करतो. आरोग्य आणि मन चांगले असेल तर तनलक्ष्मी उजळून निघते. तनलक्ष्मीचे प्रधान रूप म्हणजे ‘प्रफुल्लित चेहरा’. त्यावरील हास्य. परमेश्वरांनी देह निर्माण करताना सुरूप, कुरूप असा विचार न करता हास्य ही लक्ष्मी मुक्तपणे प्रत्येकाला मुक्त हस्ते दिलेली आहे. समर्थ रामदास स्वामी चौपदीमध्ये असे म्हणतात, ‘रसाळ मुद्रा दे रे राम’ चेहरा सदा दुर्मुखलेला, आठय़ा पडलेला, त्रासिक, रागीट, उर्मट आणि मख्ख असेल तर लक्ष्मी तिथे न नांदता अलक्ष्मीचा वास असतो असे खुशाल समजावे. ज्या चेहऱयावर उल्हास, आनंद, उत्स्फूर्तता असते तो चेहरा संपत्तीचे दान करत असतो. नारेश्वरचे संत रंगावधूत स्वामी एका पदात म्हणतात,
‘अब खुब हंसो, अब खुब हंसो।
रोते हो इसविध क्मयों प्यारे।
हसते के साथ हसे दुनिया।
रोते को कौन बुलावे रे। ’
ते म्हणतात, तुमच्याजवळ घर, गाडय़ा, पैसे, धनधान्य भरपूर असेल किंवा तुम्ही दरिद्रीही असाल. समाजाने तुमचा मान-अपमान केला तरी काळजी करू नका. राग धरू नका. नेहमी हसत रहा. कारण ‘हसणे’ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. लक्ष्मी ही स्वभावाने शांत आहे. नृसिंह अवतार धारण करीत हिरण्यकश्यपूचा वध केल्यावर विष्णू जेव्हा क्रोधाने बेभान झाले तेव्हा लक्ष्मी त्यांच्याजवळ येताच ते शांत झाले. विष्णूच्या राम अवतारात लक्ष्मी सीता म्हणून प्रकट झाली. रामायणातील सीतेचे व्यक्तिमत्व हे तक्रारशून्य आहे. ती भूमिकन्या आहे. आईच्या संस्कारानुसार ती सहनशील आहे. भूमीच्या कुशीत शिरताना दोन्ही हात जोडून, मस्तक झुकवून ती म्हणते, ‘हे रामा, माझ्या आयुष्यात जे काही घडले त्याबद्दल तुम्ही केलेल्या न्याय- अन्यायाबद्दल मला हिशेब करायचा नाही. माझी फक्त एवढीच प्रार्थना आहे की जन्मोजन्मी तुम्हीच मला पती म्हणून मिळावेत. मात्र या जन्मात झाली तशी आपली ताटातूट कधीही न होवो.’ पृथ्वीमाता हे सुद्धा लक्ष्मीचे रूप आहे. जाळून पिके घेणाऱयालाही ती समृद्ध करते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली तिला ‘वनलक्ष्मी’ म्हणतात. वृक्षांनी वेढलेले वन हे राष्ट्रसंपत्ती आहे. भारतामध्ये सर्वत्र वृक्षपूजा प्रचलित आहे. श्रीकृष्ण अवतारातील रुक्मिणी ही कृष्णसख्यांना सांभाळून घेणारी माधुर्यलक्ष्मी आहे. ती कृष्णाच्या रूपावर भाळली. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी मदन आले, असे संत एकनाथ महाराज म्हणतात.
एका तुलसीदलावर रुक्मिणीने श्रीकृष्णाला तोलले आहे. लक्ष्मीचे वाहन घुबड आहे. घुबडाचे पंख शक्तिशाली असतात. मोठे असतात. परंतु शिकार करताना ते पंखांचा अजिबात आवाज होऊ देत नाहीत. त्यामुळे ते जवळ आल्याचे भक्ष्याला कळत नाही. त्याची शांतता लक्ष्मीला आवडते. हत्ती हा उदार आहे म्हणून लक्ष्मीला आवडतो. लक्ष्मी जेव्हा गरुडावर बसून येते तेव्हा ती स्थिर राहते. विष्णुसह आल्यामुळे आनंद, समाधान, सौख्य देते. महालक्ष्मीच्या आरतीमध्ये मुक्तेश्वर म्हणतात, ‘चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी। लिहिल्या असतील माते माझे निजभाळी। पुसोनी चरणा तळी पदसुमने क्षाळी।’ हे महालक्ष्मी, ब्रह्मदेवाने जरी माझ्या ललाटी वाईट कर्मानुसार भविष्य लिहिले असेल तरी ते पुसून तू नवी अक्षरे लिही. मी तुझ्या चरणांची प्रक्षाळ पूजा करतो. व्यापक रूपाने, स्थूल, सूक्ष्मात वसणाऱया महालक्ष्मीला नमस्कार असो.
– स्नेहा शिनखेडे