संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
► प्रतिनिधी/ बेळगाव
भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून कंत्राटदार मनमानीपणे भूभाडे वसूल करत आहेत. दिले नाही तर दमदाटी करून नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे आम्हाला व्यवसाय करणे कठीण असून तातडीने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी आणि आम्हाला सहकार्य करावे, या मागणीसाठी भाजी विक्रेते, फेरीवाले यांनी महापालिकेवर मोर्चा काढून महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन दिले.
गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदार जास्तीचे भूभाडे घेत आहे. वास्तविक रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्यांकडून 10 रुपये तर फेरीवाल्यांकडून 50 रुपये वसूल करणे बंधनकारक आहे. मात्र 50 ते 100 रुपयांची मागणी करून विक्रेत्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न संबंधित कंत्राटदार करत आहेत. एक तर व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यातच अशाप्रकारे कंत्राटदारांकडून पिळवणूक होत आहे. तेव्हा संबंधित कंत्राटदाराला सूचना करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
भूभाडे वसूल करणारी कंत्राटदाराची माणसे दमदाटी करत आहेत. अशाप्रकारे जर आमच्यावर जोरजबरदस्ती होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असेही या निवेदनात नमूद केले असून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक शंकर पाटील यांच्यासह भाजीविक्रेत्या महिला आणि फेरीवाले उपस्थित होते.