खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नायक यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित, दहा दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन
खानापूर : भीमगड अभयारण्यातील ग्रामस्थांना वनखात्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. या जाचामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. जीवन जगणे कठीण बनले आहे. याबाबत वनखात्याकडे वारंवार विनंती करूनदेखील वनखात्याने आपले आडमुठे धोरण सुधारले नव्हते. यासाठी या भागातील ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्याबाबत प्रशासनाने काहीच उपाययोजना अथवा आश्वासन दिले गेले नाही. त्यामुळे भीमगड अभयारण्यात येणाऱ्या नेरसा, कोंगळा, पास्टोली, मेंडील, कृष्णापूर, गवाळी, शिरोली, जामगाव, पाली, देगाव, हेम्माडगा यासह या भागातील गावातील नागरिकांनी सोमवारी सकाळी 11 वाजता हेम्माडगा येथे रास्तारोको करत आंदोलन केले. रास्तारोको आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यासाठी खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नायक आपल्या फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर झाले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून व रास्तारोको मागे घेण्याची विनंती केली. मात्र या भागातील नागरिक रास्ता रोकोबाबत ठाम होते. वनखात्याच्या जाचक अटी व नाहक त्रास देण्याबाबत योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. त्यावेळी निरीक्षक नायक यांनी वनाधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा केली. मात्र वनाधिकाऱ्यांनी आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले तरच आम्ही निर्बंध हटवू, असे आडमुठे धोरण घेतल्यामुळे ग्रामस्थ आणखीन चिघळले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांनी वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला. याबाबत योग्य निर्णय घेऊ, असे सांगितले.
निर्णयासाठी 10 दिवसांचा अवधी
निरीक्षक नायक यांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी दहा दिवसाचा अवधी हवा आहे. तरच वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढता येईल. यासाठी ग्रामस्थांनी आपले आंदोलन थांबवावे, असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्रामस्थांनी दहा दिवसात जर भीमगड अभयारण्यातील जाचट अटी शिथिल केल्या नसल्यास पुन्हा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
लोकप्रतिनिधींची आंदोलनाकडे पाठ
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोणत्याच पक्षाच्या तसेच संघटनेच्या राजकीय नेत्यांनी या आंदोलनस्थळी भेटून पाठिंबा दर्शवला नाही. अथवा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने भीमगड अभयारण्यातील ग्रामस्थांतून प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. या आंदोलनात जय जवान जय किसान संघटनेचे कार्यकर्ते तसेच भीमगड अभयारण्यातील विजय मादार, दीपक गवाळकर, महादेव शिवोलकार, कुली कार्मिक संघटनेचे तालुका अध्यक्ष यल्लाप्पा कोलकर, शरद नाईक, वकील संघटनेचे माजी अध्यक्ष राजू बागेवाडी, अध्यक्षा लक्ष्मी मटके, कृष्णा गुरव, मॅगी पिंटो, सदानंद पालकर, विद्या बुवजी, निलम मादार, गीता मादार, राजू धोंड, अप्पू गावकर, नारायण गावकर, लक्ष्मण देसाई, रमेश पाटील, दशरथ पाटील, नामदेव गावडे, नागाप्पा पाटील, राजाराम गावडा, नागापा देसाई, विठ्ठल गावकर, शंकर गुरव, जयवंत गावकर, अनंत गावडा, रमेश पाटील, मष्णू पाटील, प्रवीण पाटील, संभाजी पाटील, भीमराव नाळकर, जणू वरक, बबन गावडे वा इतर असंख्य कार्यकर्ते, महिला मंडळे, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.