वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा जमविलेल्या आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती हवी आहे. मात्र, आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध राहणार आहे. यासाठी आज गुरुवारी संघनिवड होणार आहे.
एका वृत्तानुसार, कोहलीने बीसीसीआयला कळवले आहे की, तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांत सहभागी होणार नाही. या दौऱ्याची सुऊवात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने होईल, त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. सेंच्युरियन आणि केपटाऊन येथे अनुक्रमे बॉक्सिंग डेच्या दिवशी आणि नववर्षात कसोटी सामने होऊन या दौऱ्याची सांगता होईल.
कोहलीने बीसीसीआय आणि निवड समितीला कळवले आहे की, त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची आवश्यकता आहे आणि त्याला पुढे कधी त्यात खेळायचे आहे याबद्दल तो त्यांच्याशी संपर्क साधून कळवेल. सध्या त्याने बीसीसीआयला कळवले आहे की, मात्र आपण कसोटी क्रिकेट खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ तो दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांसाठीच्या निवडीसाठी उपलब्ध राहणार आहे, असे एका सूत्राने सांगितले आहे.
कोहलीने मायदेशात आयोजित एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना 11 डावांत एकूण 765 धावा केल्या. यामध्ये तीन शतकांचा समावेश राहिला, ज्याच्या जोरावर त्याने महान सचिन तेंडुलकरला सर्वाधिक वनडे शतकांच्या बाबतीत मागे टाकले. सध्या कोहली लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. विश्वचषकापूर्वी, कोहली आणि रोहित शर्मा यांना सप्टेंबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती, हे दोघे राजकोटमध्ये मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी परतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध असेल की नाही याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. कोहलीप्रमाणेच रोहितही वर्ल्डकपनंतर ब्रिटनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह लवकरच रोहित आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी भारतीय संघाच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार आहेत.