तिसऱया व शेवटच्या वनडेसह मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन्ही संघ महत्त्वाकांक्षी
मँचेस्टर / वृत्तसंस्था
भारत-इंग्लंड यांच्यात आज (रविवार दि. 17) निर्णायक तिसरी व शेवटची वनडे होत असून पहिल्या दोन सामन्यातील 1-1 अशा बरोबरीमुळे या लढतीला ‘व्हर्च्युअल फायनल’चे स्वरुप आले आहे. भारताने टी-20 मालिकेत लक्षवेधी यश संपादन केले असले तरी लॉर्ड्सवरील दुसऱया वनडे सामन्यात घातलेले लोटांगण चिंतेचे होते. त्या पार्श्वभूमीवर, आजच्या निर्णायक लढतीत भारताने भेदक गोलंदाजीला आक्रमक फलंदाजीची साथ देणे क्रमप्राप्त असणार आहे. ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.
दुसऱया वनडे सामन्यात 247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या 146 धावांमध्ये गुंडाळला गेला, ते चिंतेचे ठरले. अगदी रोहित शर्माने आपण स्वतः व शिखर धवनने बचावात्मक पवित्र्यावर भर देणे महागडे ठरल्याचे त्यावेळी कबूल केले. रीस टॉपली व डेव्हिड विली यांच्या अप्रतिम स्विंग व सीम गोलंदाजीला सामोरे जाताना या उभयतांना बचावावर भर देणे भाग पडले. रोहित-धवन यांच्यासारख्या अव्वल फलंदाजांनी प्रारंभी दोन षटके निर्धाव खेळून काढणे आश्चर्याचे ठरले होते.
विराट कोहलीचा खराब फॉर्म देखील भारतीय संघव्यवस्थापनासाठी चिंतेचा ठरत आला असून यामुळे आघाडीवीरांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक ठरत आले आहे. ओव्हलवरील पहिल्या सामन्यात जसप्रित बुमराहने 6 बळी घेतल्यानंतर भारताने एकहाती विजय मिळवला. मात्र, दुसऱया लढतीत भारताला अपयशाचा सामना करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर, आजच्या लढतीकडे क्रिकेट रसिकांकडे लक्ष असेल.
इंग्लिश फलंदाजांच्या कामगिरीची उत्सुकता
जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स व लियाम लिव्हिंगस्टोनसारखे स्टार इंग्लिश पॉवर हिटर आजच्या लढतीत किती बहरणार, यावर देखील बरीच समीकरणे अवलंबून असतील. साहजिकच, इंग्लंडला जेरीस आणण्यासाठी रोहित-धवनसह विराटचा खेळ उत्तम होणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे असणार आहे.
रोहित शर्मा बऱयापैकी सातत्य राखत आला असल्याने त्या आघाडीवर फारशी चिंता नाही. मात्र, 37 वर्षीय धवन पुढील वर्षात होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेत संघाचा भाग असेल का, हे अद्याप अनिश्चित मानले जाते. त्यातच धवन तूर्तास फक्त वनडे क्रिकेट प्रकारातच खेळत असल्याने त्याच्या वाटय़ाला अलीकडे फारसे सामने येत नाहीत, ही त्याची मुख्य अडचण आहे. वनडे विश्वचषकाला अद्याप 15 महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी रोहित, धवन, कोहली हेच भारताचे 3 पहिले अव्वल फलंदाज असतील का, हे निश्चित होणे आवश्यक असणार आहे.
संभाव्य संघ
इंग्लंड ः जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, बेडॉन कार्स, सॅम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हर्टन, जो रुट, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेव्हिड विली.
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः दुपारी 3.30 वा.
सलग अपयशामुळे अष्टपैलू रविंद्र जडेजावर दडपण
भारतीय गोलंदाजांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मागील 5 पैकी 4 सामन्यात भेदक मारा साकारला आहे. बुमराह, शमी यांनी कोणालाही खेळता येणार नाहीत, असे एकापेक्षा एक सरस चेंडू टाकले असून यजुवेंद्र चहलने आपल्या गोलंदाजीत लवचिक बदल करत फलंदाजांसमोर नव्याने आव्हान उभे केले आहे. प्रसिद्ध कृष्णा व हार्दिक पंडय़ा यांनीही बुमराह-शमीपासून प्रेरणा घेतली असल्याचे अलीकडील त्यांच्या कामगिरीवरुन दिसून आले आहे. मात्र, जागतिक दर्जाचा अव्वल फिरकी अष्टपैलू रविंद्र जडेजाचे सलग अपयश भारतीय थिंक टँकसाठी चिंतेचे ठरत आले आहे.
जडेजा गेलंदाजीपेक्षा फलंदाजीत अधिक लक्षवेधी योगदान देत आला असून यामुळे तो गोलंदाजी अष्टपैलूऐवजी फलंदाजी अष्टपैलू म्हणून ओळखला जात आहे. मात्र, आशियाई खेळपट्टय़ांवर जिथे किमान 2 फिरकीपटूंना 10 षटकांचा कोटा पूर्ण करणे भाग असते, तेथे त्याला सूर सापडणे भारतासाठी विशेष महत्त्वाचे असेल.
बाहेर जाणाऱया चेंडूंवर विराट कोहलीची पुन्हा परीक्षा
आजच्या तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यानंतर साधारणपणे महिनाभर विश्रांती मिळत असणाऱया विराट कोहलीकडून येथे बहारदार फलंदाजीची अपेक्षा असणार आहे. दुसऱया वनडेत 16 धावांवर बाद झाला असला तरी विराटने त्यापूर्वी फटकावलेले 3 आकर्षक चौकार त्याच्या फलंदाजीतील गतवैभवाची प्रचिती देणारे होते. विराटचे फलंदाजीतील हेच गतवैभव चाहत्यांना अपेक्षित असून त्यामुळे विराटच्या फॉर्मकडे आजही लक्ष असेल. अर्थात, प्रंटफूटवर खेळताना त्याच्याकडून अनेक चुका होत राहिल्या असून बाहेर जाणाऱया चेंडूंवर फटके मारताना तो सातत्याने बाद होत आला आहे. नेमकी हीच बाब हेरत प्रतिस्पर्धी संघांनी त्याला यष्टीबाहेर जाणारे चेंडू टाकण्यावर अधिक भर दिला आहे.
तसे पाहता, कसोटी क्रिकेटमध्ये बाहेर जाणारे चेंडू सोडून देण्याने फारसा विशेष फरक पडत नाही. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात आक्रमक फलंदाजीवर भर देणे आवश्यक असल्याने बाहेर जाणारे चेंडू सातत्याने सोडून देणे योग्य ठरत नाही आणि हीच विराटसाठी मुख्य अडचण ठरत आली आहे. योगायोग म्हणजे विराट बहरात असताना यष्टीबाहेर जाणाऱया चेंडूंचा समाचार घेण्यात आपण माहीर असल्याचे सातत्याने दाखवून देण्यात यशस्वी ठरला होता.