गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात सशस्त्र क्रांतीचे प्रणेते म्हणून दैदिप्यमान भूमिका बजावलेले काका लवंदे यांनी गोव्याच्या मुक्तिनंतरही तेवढीच महत्वाची भूमिका पार पाडून सर्वसामान्य माणसांच्या समस्या आणि अडीअडचणी त्यांच्याशी समरस होऊन सोडविल्या.
13 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज साम्राज्यशाहीच्या साडेचारशे वर्षांच्या मगरमिठीतून गोमंतकाची मुक्तता करण्यासाठी ज्या असंख्य देशभक्तांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोवा मुक्तिसंग्रामात झोकून दिले, त्यात वि. न. उर्फ काका लवंदे यांचे योगदान फार महत्वाचे आहे. त्यावेळी गोवा दमण व दीव हा संघप्रदेश होता. गोव्याबरोबर दमण व दीवही मुक्त झाले व लागलीच हे मुक्त प्रदेश भारतीय गणराज्यात विलीन झाल्याचा दिल्लीहून राष्ट्रपतींचा आदेश निघाला आणि 26 जानेवारी 1962 रोजी त्यावर शिक्कामोर्तब होऊन भारतीय घटनेने बहाल केलेले लोकशाहीचे सारे हक्क या प्रदेशाला विधीवत प्राप्त झाले.
काका लवंदे यांना पोर्तुगीज सत्तेविषयी द्वेषभावना व त्यांची सत्ता उखडून टाकण्याची कल्पना बाल्यावस्थेत निर्माण झाली. त्यांना त्यांच्या विद्यार्थीदशेत मिळालेले शिक्षक हे स्वातंत्र्यप्रेमी असल्यामुळे त्यांनी काकांना बाळकडू पाजले. त्यात कशी भर पडली ती कथाही मनोरंजक आहे.
थोरले गोवे येथे काकांच्या वडिलांचे भुसारी दुकान होते. इतर लोकांप्रमाणेच गावातील एक महिलाही दुकानातून उधारीवर जिन्नस घेत असे. पण तिची उधारी वाजवीपेक्षा जास्त झाल्यामुळे तिला उधारी देण्याचे नाकारले. त्याबरोबर पणजीच्या पोलीस कमांडरशी साटेलोटे असलेल्या त्या महिलेने खोटेनाटे सांगून काकांच्या वडिलांविरूद्ध तक्रार केली. त्यांना पोलीस चौकीवर बोलावण्यात आले व खऱयाखोटय़ांची शहानिशा न करता त्यांच्या हातावर सपासप पालमारी करून हात रक्तबंबाळ करण्यात आले. कुमारवयातील विश्वनाथने पोर्तुगीजांच्या या मग्रुरीचा डंख धरला व पोर्तुगीजांच्या हुकूमशाहीचा नायनाट करण्याचा चंग मनात बांधला. वाढत्या वयाने त्या डंखाला देशभक्तीचे खतपाणी घातले. त्यानंतर गुप्त सभा, बैठका, पत्रके वाटणे इत्यादी कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि गोवा क्रांतीचे जनक डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी जेव्हा मडगावात गोवा मुक्तिलढय़ाचे रणशिंग फुंकले तेव्हा त्यात स्वतःला सहभागी करून घेतले.
त्याचे काय झाले…. 18 जून, 1946 रोजी सायंकाळी मुसळधार पावसात डॉ. लोहिया यांनी मडगावी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्ताची पर्वा न करता, हजारो गोमंतकीयांच्या पुढे उभे राहून सालाझारशाहीचा सभाबंदी व भाषणबंदीचा कायदा मोडला. त्यांनी भाषण करायला सुरूवात करताच ऍडमिरल कॅप्टन मिरांडा यांनी त्यांना अटक केली. जाता जाता लोहियांनी त्यांच्या इंग्रजी भाषणाचे हस्तलिखित लवंदेंच्या हातात दिले व ते वाचून दाखविण्याचा आदेश दिला. घोषणांच्या आवाजातच लवंदेंनी ते भाषण मोठमोठय़ाने वाचण्यास सुरूवात केली. तोच कॅप्टन मिरांडा गर्दीतून वाट काढीत पोलिसांची कुमक घेऊन परत तेथे आले व त्यांनी लवंदेंच्या पाठीवर ‘काबालमारी’ रट्टे मारीत त्यांच्या हातातील भाषणाची प्रत हिसकावून घेतली आणि त्यांना अटक करून डॉ. लोहियांबरोबर पणजीच्या मध्यवर्ती पोलीस चौकीवर नेण्यात आले. तीन दिवसांनंतर त्यांची सुटका झाली.
या घटनेनंतर काका लवंदेंनी कधीही मागे वळून पाहिले नाही. कधी निःशस्त्रपणे तर कधी सशस्त्रपणे, कधी गुप्तपणे तर कधी उघडपणे बंड करीत, इतरांना प्रोत्साहन देत व स्वतः अग्रभागी राहून गोवा मुक्तिचा लढा चालू ठेवला. सत्याग्रही, भूमिगत, सशस्त्र सैनिक यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदत करीत स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटते ठेवले. ज्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला त्याचवेळी इतर अनेक देशभक्तांबरोबर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गोवा मुक्त झाला आणि इथे स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे वारे वाहू लागले. तरी साडेचारशे वर्षांच्या जुलमी राजवटीतील अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती तात्काळ बंद होणे शक्य नव्हते त्यामुळे जनजागृती करण्याचे स्वकियांच्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱया प्रवृत्तीस पायबंद घालण्याचे काम काकांनी हाती घेतले, यासाठीही त्यांनी समविचारी लोकांचा गट तयार करून सामूहिकपणे अन्याय, अत्याचाराविरूद्ध दोन हात करण्याचे कसब दाखविले.
मुक्त गोव्यात शिक्षणाची दारे खुली झाली तरी येथे मराठी शिक्षण घेतलेले शिक्षक कुठे होते ? त्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक या शेजारील राज्यातून शिक्षक आणावे लागले. पण पोर्तुगीजधार्जिण्या व मराठी विरोधी नोकरशाहीने अशा भरतीस विरोध केला. तेव्हा शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध लवंदे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहिले व त्यांना न्याय मिळवून दिला.
गोव्यातील कुळ मुंडकार यांना संरक्षण मिळावे, जमीन सुधारणा कायदा अस्तित्वात यावा, येथील बेकारी नष्ट व्हावी, दीन-दलितांवर होणाऱया जुलूमांना आळा बसावा आदी गोष्टींसाठी मुक्तीनंतर लवंदेंनी महत्वाचे योगदान दिले.
‘भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी । या अन्यायाविरूद्ध अखेरपर्यंत कार्य केलेल्या काकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !
– शंभू भाऊ बांदेकर