पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रात पुढील आठवडाभर हलक्या ते अतिहलक्या पावसाच्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आल्याने बळीराजासह सगळय़ांच्या चिंतेत भर पडली आहे. दुसरीकडे राज्याचा जलसाठाही कमी झाल्याने आता नवे संकट राज्यासमोर उभे ठाकले आहे.
संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात ओढ दिली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात अवर्षणाची स्थिती निर्माण झाली असून, तूट सरासरीच्या उणे 57 टक्के इतकी झाली आहे. दुसरीकडे सर्व जिल्हय़ांची स्थितीही पावसाच्या बिकट असून, दुष्काळाच्या उंबरठय़ावर हे जिल्हे आहेत.
ऑगस्ट महिन्यात विदर्भ वगळता इतरत्र पावसाने ओढ दिली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात थोडाफार पाऊस झाला. मात्र, पोषक स्थितीअभावी इतरत्र मात्र पाऊस झालाच नाही. पुढील आठवडाभर कोणतीही पोषक स्थिती पावसासाठी निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्यभर हलक्या ते अतिहलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
सर्व जिल्हे अवर्षणात
राज्यातील सर्वच जिल्हय़ांत पावसाची मोठी तूट आहे. यात अवर्षण ते दुष्काळापर्यंत काही जिल्हय़ांची अवस्था आहे. 1 ते 29 ऑगस्टपर्यंतची आकडेवारी पाहता पालघरमध्ये सरासरीच्या उणे 65, मुंबई उपनगर उणे 66, मुंबई शहर उणे 77, ठाणे उणे 50, रायगड उणे 57, रत्नागिरी उणे 48, सिंधुदुर्ग उणे 51, कोल्हापूर उणे 58, सांगली उणे 80, सातारा उणे 63, पुणे उणे 58, नगर उणे 81, नाशिक उणे 50, सोलापूर उणे 85, नंदुरबार उणे 70, धुळे उणे 63, जळगाव उणे 61, औरंगाबाद उणे 67, बीड उणे 83, उस्मानाबाद उणे 86, नागपूर उणे 40, चंद्रपूर उणे 51, अमरावती उणे 74, यवतमाळ उणे 55, गडचिरोली उणे 27 इक्के पाऊस झाला आहे.
भिस्त सप्टेंबरवर
भारतीय हवामान विभाग सप्टेंबर महिन्याच्या पावसाचा अंदाज लवकरच जाहीर करणार आहे. या सप्टेंबरच्या पावसावरच आता देशाची व राज्याची भिस्त आहे. यंदा मान्सूनही लवकर माघारी फिरण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्हे हे केवळ परतीच्या मान्सूनवर अवलंबून आहेत.
पाणीसाठय़ात घट
राज्यातील धरणसाठय़ात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. सध्या हा पाणीसाठा 64.69 टक्के इतका आहे. पावसाअभावी पाणीसाठय़ात म्हणावी तितकी वाढ झाली नाही. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 83.88 टक्के इतका आहे. यात सर्वात कमी औरंगाबाद विभागात 31. 51 टक्के, तर नागपूर 78. 16, अमरावती 70.39, नाशिक 60.71, पुणे 70.44, कोकण 89.96 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
देशाची तूट 8 टक्क्यांवर
दरम्यान, 1 जून ते 29 ऑगस्टची आकडेवारी पाहता उणे 8.68 टक्के पावसाची नोंद झाली आहे.