वाकरे, प्रतिनिधी
वाकरे (ता.करवीर ) येथे ११ एप्रिल २०२३ रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत असून, हे पंचनामे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.तसेच बाधित क्षेत्र अधिक असूनही नुकसानभरपाई रक्कम कमी मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.तर योग्य पद्धतीने पंचनामे केल्याचा खुलासा कृषी विभागाने केला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ११ एप्रिल २०२३ रोजी वाकरे परिसरात अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती.या परिसरात सुमारे एक किलो वजनाच्या गारा पडल्याने उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. उसाची पाने फाटल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. हे ऊस पिक हाताला लागणार की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये धास्ती होती.यावेळी शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झालेल्या ऊस पिकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिंदे -शिवसेना व भाजप सरकारने या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ताबडतोब पाहणी करून शासनास अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते.
या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,शास्त्रज्ञ,सर्कल,तलाठी व ग्रामसेवक यांनी या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून शासनास अहवाल पाठवला होता.शास्त्रज्ञांनी गारपिटीमुळे चाळीस ते पन्नास टक्के नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता.त्याप्रमाणे संपूर्ण ऊस क्षेत्राला नुकसान भरपाई न देता ४० ते ५० टक्के क्षेत्राला प्रति गुंठा १७० रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय झाला होता.मात्र यामध्ये कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७० रुपये न देता सरसकट २००० रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने केला होता.त्याप्रमाणे आज नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आणि त्यांना मिळालेल्या रकमेची यादी जाहीर करण्यात आली.मात्र यातील काही शेतकऱ्यांचे क्षेत्र अधिक असताना त्यांना अवघी २००० रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे, तर एक गुंठा क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना २००० रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.त्यामुळे अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.म्हणून या यादीवर त्यांनी आक्षेप घेतला असून तक्रार करणार असल्याचे सांगितले.दरम्यान, ही रक्कम जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने ही रक्कम मिळत मिळण्यापूर्वीच परत जाणार की काय? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
योग्य पध्दतीने पंचनामे केले- कृषी सहाय्यक
याबाबत कृषी सहाय्यक रणजीत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाच्या पाहणी समितीने योग्य ते पंचनामे केले असून, सर्वांना शासन निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिल्याचे सांगितले.याबाबत कोणावरही अन्याय केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार न करता योग्य निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.
१०३ गुंठे क्षेत्राला १३९५ रुपये
रावसो पाटील यांनी आपल्या पत्नी मंगल पाटील यांच्या १०३ गुंठे क्षेत्रातील ऊसाचे नुकसान झाले होते,मात्र केवळ १३९५ रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचे सांगितले.त्यामुळे आपल्या क्षेत्राचा चुकीचा पंचनामा झाला आहे, त्यामुळे याबाबत योग्य तो योग्य ती कार्यवाही कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
८ एकर क्षेत्राला १० हजार रुपये नुकसानभरपाईशिवाजी सूर्यवंशी यांनी आपल्या एकत्र कुटुंबाची ८ एकर शेती असून, केवळ ६० गुंठे क्षेत्र पकडून १० हजार रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचे सांगितले. ५ एकरला दोन हजार रुपये नुकसान भरपाई- शेतकरी भिकाजी चौगले यांनी आपल्या १३००,१३०२, १३०३ या गट क्रमांकातील ५ एकर क्षेत्राला केवळ दोन हजार रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचे सांगितले.
एक एकर क्षेत्राला दोन हजार रुपये
दत्तात्रय दाजी पाटील यांनी आपल्या एक एकर क्षेत्राला केवळ दोन हजार रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचे सांगितले.