रस्ता रुंदीकरणातील अर्धवट कामांमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान,पावसाचा धुमाकूळ
गुहागर/वार्ताहर
परतीच्या पावसाने मंगळवारी सकाळी तालुक्यात धुमाकूळ घातला. शृंगारतळी बाजारपेठेत पाणी साचून ते रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये घुसले. त्यामुळे व्यापाऱयांचे मोठे नुकसान झाले. रस्ता रुंदीकरणात गटारांची कामे अर्धवट असल्याने व पाण्याचा निचरा न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली.
तालुक्यात सकाळपासून सुरुवात झालेल्या पावसाने दुपारपर्यंत चांगलाच जोर धरला होता. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट बराच वेळ सुरु होता. अवघ्या 2 तासांतच पावसाच्या पाण्याने शृंगारतळी परिसर जलमय झाला. शृंगारतळी बाजारपेठेत काही ठिकाणी गटारांचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका व्यापाऱयांना बसला. रस्त्यावर पाणी साचून त्याचा निचरा न झाल्याने व गटारांमधील तुंबलेले पाणी बाहेर आल्याने रस्त्यालगतच्या दोनही बाजूंच्या दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाजारपेठेतील बसथांब्याचे अजूनही काम न झाल्याने अनेक प्रवाशांना दुकाने, टपऱ्यांचा आसरा घ्यावा लागला. दरम्यान, तालुक्यात दिवसभर पावसाळी वातावरण पहायला मिळाले. पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातशेती आडवी पडली. शेती कापणीयोग्य झाली आहे. मात्र पावसाच्या भीतीने अद्यापही कापणीला सुरुवात झालेली नाही. परतीचा पाऊस कधी जाईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
शृंगारतळी, जानवळे, वेळंबमध्ये वीज पडून मोठे नुकसान
शृंगाळतळीत परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जानवळे-बौध्दवाडीतील सुधीर जाधव यांच्या घरावर वीज पडल्याने घराचे संपूर्ण इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच वेळंब-बौध्दवाडीतील जगदीश शिवराम जाधव यांच्या घराशेजारील शौचालयावर वीज पडल्याने त्यांचेही घरातील वायरिंग जळून नुकसान झाले आहे. शृंगारतळीतील सद्गुरू मोटर्स ट्रेनिंगचे अमिष कदम यांच्या घरातलाही टीव्ही, वीजमीटर जळून मोठ्या पमाणात नुकसान झाले आहे.