पांगुळ गल्लीत जलवाहिनीला गळती
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. पांगूळ गल्लीत शुक्रवारी जलवाहिनीला गळती लागून शेकडो लिटर पाणी वाया गेले. तसेच पाणी गल्लीत पसरल्याने ये-जा करणाऱया अडचणींना तोंड द्यावे लागले. शहरात सातत्याने पाणी गळतीचे प्रकार सुरू असल्याने शहराला पाणी गळतीचे ग्रहण लागले आहे. संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून नाराजी क्यक्त होत आहे.
शहरात दररोज कुठेना कुठे जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जात असते. विकास कामे, खोदाई आणि इतर कारणांमुळे जलवाहिन्या फुटतात. आणि पाण्याचा अपव्यय सुरू होतो. शासनाकडून पाण्याचा गैरवापर टाळा, असे सांगितले जाते. मात्र, एलऍण्डटी कंपनीचे मात्र वाया जाणाऱया पाण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शहरात दोन तीन दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
पांगूळ गल्लीत पाणी वाया जात असले तरी संबंधित अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. जलवाहिनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाण्याचा अपव्यय सुरुच आहे. त्यामुळे एलऍण्डटी कंपनी झोपेचे सोंग घेत आहे. अशा प्रश्नही उपस्थित होत आहे. पाण्याचा अपव्यय टाळा, असे सांगितले जाते. मात्र एलऍण्डटी कंपनीकडूनच पायमल्ली होताना दिसत आहे. संबंधित जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.