पुणे : गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजता खडकवासला धरणातून 1 हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीपातळीत जरी वाढ झाली असली तरी देखील पुणे शहरात लागू असलेली कपात अद्याप मागे घेतली जाणार नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात आढावा घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. पुण्यातील धरणांमध्ये सध्या 17.21 टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 3.27 टीएमसी पाणीसाठा कमी आहे.