11 टँकरने 47 ठिकाणी पाणीपुरवठा : बालिंगा येथील एक पंप अद्यापही बंद, नदीतील पाण्याच्या पातळीवर शहरातील पाण्याचे भवितव्य
कोल्हापूर/प्रतिनिधी
पाऊस लांबून धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाटबंधारे विभागाने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. परिणामी नदीची पाण्याची पातळी कमी झाल्याने महापालिकेच्या उपसा केंद्रातून पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे शहरातील पाण्याचा बट्याबोळ उडाला आहे. महापालिकेने रविवारी 9 टँकरने तीव्र टंचाई असणाऱ्या 47 ठिकाणी पाणीपुरवठा केला. दरम्यान, धरणातून पाणी सोडले आहे. बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा मनपाने केला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा नागदेववाडी व शिंगणापूर येथील उपसा केंद्राच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने उपसा प्रक्रियेवर परिणाम झाला. बालिंगा उपसा केंद्रातील तीन्ही पंप पूर्ण क्षमतेने सुरू होत नव्हते. त्यामुळे शहरात गेले चार दिवस अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्ता रोको आंदोलन करत आहेत. याची गंभीर दखल मनपा पाणीपुरवठा विभागाने घेतली असून पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्यासाठी कळवले आहे.
पाटबंधारे विभागाने नदीपात्रात पाणी सोडले आहे. उपसा केंद्राच्या ठिकाणी रविवारी नदीची पाण्याची पातळी 1760 फूट आवश्यक असताना 1754 फूट झाली होती. धरणातून विसर्ग वाढविल्याने रविवारी पाण्याची पातळी 1758 फूट झाली आहे. बालिंगा उपसा केंद्राच्या ठिकाणी उपसासाठी आवश्यक पाणी पातळी झालेली नाही. येथील एक पंप अद्यपाही बंद आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा अद्यपाही विस्कळीतच आहे. काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर उंचावर असणाऱ्या परिसरात पाणीच येत नाही. अशा ठिकाणी महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रविवारी दिवसभरात मनपाचे 5 टँकरने 27 ठिकाणी तर 4 खासगी टँकरने 20 ठिकाणी पाणीपुरवठा केला. महापालिकेच्या पाण्याच्या टँकरची प्रतिक्षा न करता काही नागरिकांनी खासगी टँकरने पाणी खरेदी केले.
टँकरच्या नियोजनासाठी 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महापालिकेने 5 खासगी टँकर भाड्याने घेतले आहेत. तसेच मनपाचे 6 टँकर आहेत. तीव्र पाणी टंचाई असणाऱ्या परिसरात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याच्या नियोजनासाठी 6 शाखा अभियंताची नियुक्ती केली आहे. यामध्ये अरुण गुजर, मिलींद पाटील, अभिलाशा दळवी, मिलींद पाटील, प्रिया पाटील, राजेंद्र हुजरे यांचा समावेश आहे.
15 जुनपर्यंत उपसा बंदी
शहरातील पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. मात्र, हे पाणी शेतीसाठी वापर होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतांनी 13 ते 15 जूनपर्यंत उपसा बंदीचे आदेश काढले आहेत. राधानगरी ते शिंगणापूर बंधारा, तुळशी धरण ते बीड बंधारा, कुंभी ते भोगावती नदी, कासारी धरणापासून प्रयाग चिखलीपर्यंत उपसा करण्यास बंदी घतली आहे.
शिंगणापूर उपसा केंद्र -7 पैकी 5 पंप सुरू
नागदेववाडी-2 पैकी 1 पंप सुरू, 1 रिझर्व्ह
बालिंगा -3 पैकी 1 पंप बंद
शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा शक्य
शहरात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यावर पर्याय म्हणून महापालिकेने बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठ्यातील अधिकाऱ्यांची यासंदर्भात रविवारी बैठक झाली. पाटबंधारे विभागाने शहरातील पाण्याची स्थितीचा विचार करून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. तसेच दोन दिवसांत मान्सुन कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. परंतू पाण्याचा साठ्यात इतक्या गतीने वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पाणी संकटाचा विचार करून मनपा पाणीपुरवठा विभागाने गतवर्षी प्रमाणे यंदाही दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नियोजनही केले आहे. यामध्ये कोणत्या वॉर्डमध्ये कधी पाणीपुरवठा करायचा आणि कधी पाणीपुरवठा बंद ठेवायचा याचा समावेश आहे. बुधवारपासून यांची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे.
दोन दिवसांपैकी एका दिवशी मुबलक पाणी
दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास ज्या भागात पाणीपुरवठा होणार तेथे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. यामुळे दोन दिवसांपैकी एक दिवस पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार आहे. गतवर्षी अशीच स्थिती झाली होती. त्यावेळी हा प्रयोग यशस्वी झाला होता.