संपर्क रस्त्यांवरील हिरवाई आता फुलू लागली : पावसाळ्यानंतर सर्व रोपांचे जतन व्हावे यासाठीच निगा
प्रतिनिधी / बेळगाव
वनखात्यामार्फत दरवर्षी लाखो रोपांची लागवड केली जाते. या रोपांच्या संवर्धनासाठीदेखील पाणी आणि कुंपणाचे काम केले जाते. पावसाळा संपल्यानंतर लावलेल्या रोपांना पाणी दिले जाते. सामाजिक वनीकरणामार्फत तालुक्यातील विविध संपर्क रस्त्यांवर पावसाळ्या दरम्यान रोपे लावली आहेत. या रोपांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. चलवेनहट्टी, अगसगा, कडोली, हंदिगनूर, बंबरगा, मंडोळी, बेळगुंदी भागातील संपर्क रस्त्यांवर लावलेल्या झाडांना पाणी दिले जात आहे.
प्रदूषण टाळण्याबरोबर झाडांची संख्या वाढविण्यासाठी वनखात्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी पावसाळ्यादरम्यान लाखो रोपांची लागवड केली जाते. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यातील विविध रस्त्यांवर 35 हजाराहून अधिक रोपांची लागवड केली आहे. केदनूर, बंबरगा, न्यू वंटमुरी, तारिहाळ, अगसगा, हिंडलगा, होनगा, काकती, मास्तमर्डी, करडीगुद्दी आदी भागात रोप लागवड केली आहे.
यंदा 35 हजार रोपांची लागवड गतवर्षी 30 हजार रोपांची लागवड झाली होती. मात्र, यंदा पाच हजार अधिक रोपे लावण्यात आली आहेत. यामध्ये फणस, आंबा, कडीपत्ता, चिकू, वड, लिंबू, पिंपळ आदी जातीच्या रोपांचा समावेश आहे. तालुक्यातील लहान संपर्क रस्त्यांवर ही हिरवाई आता फुलू लागली आहे. पावसाळ्यानंतर या सर्व रोपांचे जतन व्हावे, यासाठी खात्यामार्फत पाणी दिले जात आहे. त्याबरोबर रोपांच्या सभोवती कुंपणदेखील घातले जात आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व संपर्क रस्ते विविध झाडांच्या फळांनी फुलणार आहेत. त्याबरोबर रस्त्यावर सावलीचा निवारा उपलब्ध होणार आहे.