सावंतवाडी/प्रतिनिधी-
मंगळवारी शिंदे गटाच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यात संमिश्र प्रतिकिया उमटली असून शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ता डॉ जयेंद्र परुळेकर यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. सदरच्या मंत्री मंडळ विस्तारामध्ये एकही महिला सदस्याला संधी दिली नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी खोचकपणे प्रतिक्रिया व्यक्त केले आहे.
परुळेकर म्हणाले, चाळीस दिवसांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज शिंदे गट आणि भाजप युती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला… गंगेत घोडं न्हालं….जिजाऊसाहेब,सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मृणालताई गोरे, अहिल्याताई रांगणेकर या रणरागिणींच्या पुरोगामी महाराष्ट्रात सदर भाजप प्रणित शिंदे सरकारने एकाही महिलेला मंत्री पद न देऊन महिलांचा मोठा सन्मान केलेला दिसून येत आहे. सदर मंत्री मंडळ विस्तारामुळे महाराष्ट्रातील महिला वर्गात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित समस्त मंत्र्यांना महिलांचा विशेष सन्मान व गौरव केल्याबद्दल धन्यवाद व पुढील महिला सबलीकरणाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
तसेच पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी आरोपी असलेल्या मंत्रांना मंत्रिपद देणे लांच्छनास्पद असल्याचेही परुळेकर म्हणाले. या संबधी ते म्हणाले, पूजा चव्हाण या युवतीचा श्री संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद बहाल करून मरणोत्तर मोठाच मानसन्मान केलेला दिसून येत आहे.