जळगाव / प्रतिनिधी :
Review of Jalgaon district by Jayant Patil : भाजपा त्यांच्या कार्यकर्त्यांना नीट सांभाळते. राष्ट्रवादी काँग्रेस अडीच वर्षे सत्तेत होती, या काळात पक्षाने कार्यकर्त्यांना काय दिले? किती निधी उपलब्ध करून दिला, असा रोखठोक सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारला. जयंत पाटील यांनी देखील ही बाब मान्य करत आपल्या सूचनांची आपण नोंद घेतली आहे, असे सांगून त्यावर पडदा पाडला.
जयंत पाटील हे आज जळगावच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी पक्ष कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते जाणून घेत जिल्हयाचा आढावा घेतला. यावेळी लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली.
विविध तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडताना गेल्या अडीच वर्षात कार्यकर्त्यांना कोणतीही ताकद दिली गेली नाही. पालकमंत्री आपले असले तरी निधी मिळाला नाही, ग्रामपंचायत सदस्यांना मदत दिली जात नाही. सुरक्षा कडक असताना सामान्य कार्यकर्त्यांनी तुम्हाला भेटायचे कसे? सत्ता गेल्यानंतर आढावा घेत आहात पूर्वी का घेतला नाही, असा सवाल करत अडीच वर्षांची सत्ता गेल्यावर आता हातात काय राहीले आहे, अशी विचारणा केली. एका मुस्लीम पदाधिकाऱ्याने अल्पसंख्यांकांचे फोन का घेतले जात नाहीत. आमच्या समस्यांकडे का लक्ष दिले जात नाही अशी विचारणा केली. तसेच मुस्लीमांची कामे होत नसल्याने या समाजाचे लोक आपल्या पाठीशी नसल्याचे सांगितले.
अधिक वाचा : महाराष्ट्रात ‘खोके हराम’ संघटना, शिवसेनेची शिंदे गटावर जहरी टीका
जयंत पाटील म्हणाले, जिल्हयातील शिवसेनेमुळे जे-जे मतदारसंघ आपण गमावले तेथील आमदार आता शिंदेगटासोबत गेल्याने तेथील सामान्य कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. या सर्व मतदारसंघात पक्ष वाढीचा प्रयत्न केला पाहिजे. दोन वर्षानंतर निवडणुका आहेत, पण हे शिंदे सरकार कोसळले तर लगेच निवडणुका होऊ शकतात हे लक्षात घेऊन तुम्ही रान पेटवायला सुरवात करा. आपापसातील मतभेद विसरून पक्ष संघटनेच्या कामास लागण्याचे आवाहन त्यांनी केले.