सिद्धापूर येथील प्रचारसभेत काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचा टोला
खानापूर : माझा जन्म माझ्या आईच्या पोटी झाला. मात्र, माझी कर्मभूमी कर्नाटक राहिली आहे. मी हिंदू धर्मात जन्मले असल्याचा मला अभिमान आहे. मी हिंदू परंपरेप्रमाणे मंगळसूत्र परिधान करते. देशासाठी बलिदान दिलेल्या राजीव गांधी यांच्या पत्नी श्रीमती सोनिया गांधी यांनीही मंगळसूत्र देशासाठी अर्पण केलेले आहे. मंगळसूत्राचे महत्त्व माहीत नसणाऱ्या पंतप्रधानांना मंगसूत्राबाबत बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांना मंगळसूत्राचे महत्त्व काय आहे हे समजले असते तर इतक्या हिन पातळीवरून ते बोललेच नसते, असे उद्गार कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांनी सिद्धापूर येथील प्रचारसभेत काढले. त्या पुढे म्हणाल्या, मोदींना पंतप्रधानपदाचे महत्त्वच समजलेले नाही. त्यामुळे ते भाजपचे प्रचार मंत्री म्हणून गेली दहा वर्षे वावरत आहेत. यापूर्वी जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, इंदिरा गांधी, नरसिंहराव, मनमोहन सिंग असे पंतप्रधान आपण पाहिले आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाला साजेसे वक्तव्य केलेले आहे. काँग्रेसमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाली. त्या काळी आमच्या कॉलेज जीवनात राजीव गांधी यांनीच आम्हाला विद्यापीठात व्हॉट्सअॅप मोबाईल दिला होता. त्याचा वापर कधीही स्वत:च्या प्रचारासाठी आणि खोटी माहिती पसरवण्यासाठी केला नाही. मात्र, भाजपने व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खोटीच माहिती पसरवून युवकांना बिघडविले आहे.
गेल्या दहा वर्षांतील खोट्या आश्वासनांमुळे मोदींचे पितळ उघडे पडले आहे. देशात बेरोजगारी, महागाई यासह अनेक समस्यांचा डोंगर उभा असताना धर्माच्या नावाखाली स्वत:च्या स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करून देशातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडविले गेले आहे. जनतेला आता खोट्या आश्वासनांपेक्षा वास्तव विकास आणि सामाजिक हक्काची जाणीव झाली आहे. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसकडेच आशेने पाहत आहे. देशात काँग्रेसच सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकणार आहे. कर्नाटकात काँग्रेसने महिलांच्या सबलीकरणासाठी योजना राबविल्या आहेत. तसेच युवकांना नोकरी मिळेपर्यंत मानधन देऊ केले आहे. विद्युत बिलापासून मुक्ती दिलेली आहे. काँग्रेस देशात सत्तेत आल्यास महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. आज देशातील शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. शेती मालाला अपेक्षित दर देण्यात येत नसल्याने शेतकरी आर्थिक नुकसानीत सापडला आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिद्धापूर विभाग काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.