बससेवा पुरविताना परिवहनची होतेय दमछाक : प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
बीएमटीसीकडून वायव्य परिवहन मंडळाने विकत घेतलेल्या जुन्या बस अद्याप बेळगाव विभागात दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे बससेवेत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बीएमटीसीने आयुर्मान संपलेल्या आणि भंगारात काढलेल्या बसेस वायव्य परिवहन मंडळाने खरेदी केल्या आहेत. त्यापैकी 20 बसेस बेळगाव विभागाच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र अद्याप एकही बस दाखल झाली नाही. त्यामुळे बससेवा पुरवताना परिवहनची दमछाक होताना दिसत आहे.
मे महिन्यादरम्यान बीएमटीसीच्या जुन्या बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ऑगस्ट संपला तरी अद्याप जुन्या बस दाखल झाल्या नाहीत. बीएमटीसीने 8 ते 9 लाख किलोमीटर धावलेल्या 25 बसेस भंगारात काढल्या होत्या. दरम्यान 50 हजार ते 1 लाख रुपये किमतीला परिवहन मंडळाने त्या खरेदी केल्या. त्यामुळे बेळगाव ताफ्यात लवकरच बसेस दाखल होतील, असे वाटत होते. मात्र अद्याप तसे झाले नाही. कोरोनामुळे परिवहनला प्रचंड फटका बसला आहे. त्यामुळे परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला आहे. परिवहनला नवीन बसेस खरेदी करण्यासाठी निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे परिवहनने बीएमटीसीच्या जुन्या बस खरेदी केल्या होत्या. मात्र त्या अद्याप बेळगाव विभागात दाखल झाल्या नाहीत.
बेळगाव विभागाला महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द लागून आहे. त्यामुळे बेळगाव विभागात प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बसेसचीदेखील अधिक गरज असते. मात्र सध्या बेळगाव विभागात बसेसची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. राज्यात बेळगाव विभाग महसूल मिळवून देणारा म्हणून ओळखला जात असला तरी बेळगाव विभागातच बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे बऱयाच ठिकाणी अद्यापही बससेवा नसल्याचे चित्र दिसून येते.
बेळगाव विभागात यापूर्वी धारवाड, हुबळी येथील जुन्या बस आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता बीएमटीसीच्या जुन्या बस आणण्यासाठी हालचाली सुरू होत्या. शिवाय काही बसेसची खरेदीदेखील झाली होती. मात्र अद्याप त्या ताफ्यात दाखल झाल्या नाहीत. बेळगाव विभागात नवीन दोनशे बसेसची गरज आहे. मात्र शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने जुन्या बसवरच सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप जुन्या बसही दाखल न झाल्याने परिवहनसमोर समस्या वाढल्या आहेत.
कोरोनानंतर महसूल वाढविण्यासाठी परिवहनची धडपड सुरू आहे. विविध ठिकाणी जादा बस सोडून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने बेळगाव विभागासमोर पेच निर्माण झाला आहे. सण-उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरे होत असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत बेळगाव विभागात बसेसची संख्या कमी असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
सातत्याने इंधनाच्या किमतीत होणारी वाढ त्यातच मागील चार वर्षांत तिकीट दरात कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे परिवहनसमोर बससेवा पुरविताना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय नवीन बस खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने उपलब्ध असलेल्या बसवरच प्रवाशांना सेवा पुरवावी लागत आहे.
नवीन बसेस खरेदीसाठी अनुदान नाही
बीएमटीसीकडून बस खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या लवकरच बेळगाव विभागाच्या ताफ्यात दाखल होतील. ज्या ठिकाणी बस अपुऱया आहेत, त्या ठिकाणी बसेस सोडल्या जाणार आहेत. नवीन बसेस खरेदीसाठी अनुदान उपलब्ध होत नाही.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी)
लांब पल्ल्याच्या बसेस फुल्ल
गणेशोत्सव करून परतणाऱयांची संख्या अधिक, गोवा मार्गावरील बसेसना गर्दी
बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर बसस्थानक गजबजलेले पहायला मिळत आहे. स्थानिक बसबरोबर आंतरराज्य मार्गांवर धावणाऱया बसदेखील फुल्ल होताना दिसत आहेत. याचबरोबर गणेशोत्सवात गोव्यातून खरेदीसाठी येणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गोवा बसदेखील फूल्ल होताना दिसत आहेत. त्यामुळे बेळगाव आणि गोवा राज्याच्या परिवहनलाही दिलासादायक बाब आहे.
कोरोनाकाळात बससेवा पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे परिवहनला कोटय़वधीचा तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर सुरू झालेल्या बससेवेलादेखील म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता सण-उत्सवही मोठय़ा प्रमाणात साजरे होत असल्याने बाहेर पडणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. गोव्यातून खरेदी आणि इतर कामासाठी बेळगावात येणाऱया नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बेळगाव, गोवा मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गोवा बसेस प्रवाशांनी भरून धावताना दिसत आहेत.
बैलहोंगल, चिकोडी, हुक्केरी, गोकाक, निपाणी, सौंदत्ती, बागलकोट आदी बसेसनादेखील प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक आदी मार्गावरदेखील बसेसची संख्या वाढली आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी आलेले नागरिक परतताना दिसत आहेत. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ दिसून येत आहे. विशेषतः पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी परतणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे. शिवाय बसस्थानकात आगाऊ बुकिंग केले जात आहे.
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या आणि आता गणेशोत्सव करून परतणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. गोवा, मुंबई आणि पुण्याकडे जाण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसही फुल्ल होऊन धावताना दिसत आहेत.