बेशिस्त पर्यटक, स्थानिकांवर व्हायला हवी कारवाई ; सरकारच्या निष्काळजीपणांवर लोकांत तीव्र नाराजी
दत्ता शिरोडकर /पर्वरी
अटल सेतुवर अपघातांचे सत्र सुरूच आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून छोटय़ा मोठय़ा अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून त्यात मेरशी येथील एका पोलिसाचाही बळी गेला आहे. वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेशिस्त पर्यटक, थानिक वाहनचालकांवर कारवाई व्हायला हवी. वाहतूक नियंत्रण व्यवस्था व्हायला हवी. मात्र सरकारतर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत नसल्याने जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.
मेरशीतील पोलीस या पुलावरील पहिला बळी ठरला होता. त्यापूर्वी पुलाचे काम सुरू असताना एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर कंपनीने खबरदारी घेऊन घटनेची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. पण पूल तयार झाल्यानंतर अपघात मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. सरकार आणि वाहतूक खात्याने हे अपघात सत्र थांबविण्यासाठी तातडीने उपाय करण्याची गरज आहे. नाही तर एक दिवस मोठा अपघात होऊन अनर्थ होण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
मांडवी नदीवर अगोदरच दोन पूल असूनही वाहनचालकांना दररोज ‘ट्रफिक जाम’च्या कटकटीना सामोरे जावे लागत असत. खास करून नववर्ष, नाताळ किंवा सलग जोडून सुट्टय़ा आल्या तर मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत असत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असे. या सर्व कटकटीतून सुटका करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दित ‘अटल सेतू’ हा मांडवी नदीवर तिसरा पूल बांधण्यात आला.
गोव्यातील हा सर्वात जास्त लांबीचा आणि उंच केबल स्टेड पूल आहे. हा पूल जास्त उंचीवर बांधल्यामुळे हवेची गती जास्त असल्याने हा धोका टाळण्यासाठी दुचाकी आणि तीन चाकी गाडय़ांना या पुलावरून वाहतूक करण्यास निर्बंध घातले होते. तसेच अन्य वाहनचालकाना गती मर्यादा घालण्यात आली होती. पण या पुलावरून सर्रास दुचाकीवाले जात असताना दिसत आहेत. तसेच वाहनचालक गती मर्यादेचे पालन करताना दिसत नाहीत. अशा बेशिस्त वाहनचालकाना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसानी जबर दंड स्वीकारला पाहिजे. तसेच या पुलावर काही दिवस नियमित वाहतूक पोलिसांतर्फे ‘स्पीड गन’उभी करून वेग मोजला पाहिजे. अशी व्यवस्था नसल्याने वाहनचालक फायदा घेऊन निष्काळजीपणाने वेगाने वाहने चलविण्याचे प्रकार घडत आहेत.
प्रस्तावाची अजून कार्यवाही नाही
पुलावर सीसी टीव्ही कॅमेरे तसेच ‘स्पीड गन’ बसविण्याचा प्रस्ताव यापूर्वी वाहतूक पोलिसानी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाला पाठविला आहे. त्याला अनेक महिने उलटले पण अजूनही कार्यवाही झालेली नाही.
सेल्फी, शुटिंगला आळा घालायला हवा
अटल सेतुवरून प्रवास करताना दोन्ही बाजुतील मांडवी नदीच्या पात्रातील नयनमनोहरी दृश्य पाहून कोणाचेही काही सेकंद लक्ष विचलित होते. तसेच पर्यटक सेल्फीच्या नादात किंवा गोव्याच्या प्रवासाची चित्रे मोबाईलमध्ये कैद करण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो आणि अपघात होतात, असे निदर्शनाला आले आहे. याला कुठेतरी आळा घालायला पाहिजे. नाहीतर आज ‘स्टेट ऑफ आर्ट’ म्हणून मिरविणारा अटल सेतु एक दिवस बदनाम होईल आणि मृत्यूचा सापळा बनून राहील.
‘रेंट ए बाईक’ बंद करायला पाहिजे.
‘रेंट ए बाईक’हा प्रकार पूर्णपणे बंद करायला पाहिजे. पर्यटक ‘रेंट ए बाईक’वर गाडी घेऊन निष्काळजीपणाने चालविताना दिसत आहेत. समुद्रकिनाऱयावर कार किंवा दुचाकी चालविणे मनाई आहे. तरीसुद्धा बेशिस्त देशी तसेच परदेशी पर्यटक बिनधास्त गाडय़ा चालविताना दिसत आहेत. नुकताच मोरजी येथे असा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून समुद्रकिनाऱयावरील पोलिस काय करतात? असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठी सरकार आणि पर्यटन खाते यांनी कठोर निर्बंध घालून अशा बेशिस्त पर्यंटकाना आळा घातला पाहिजे.
सरकारने पर्यटनाला चालना देत असताना अशा बेशिस्त पर्यंटकावर कडक कारवाई केली पाहिजे. काही वेळा वाहतूक पोलिस त्यांच्यासोबत हात मिळवणी करताना दिसत आहेत. हे कुठंतरी थांबवायला पाहिजे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूने किमान अर्धा किलोमीटर अंतरावर ठळक अक्षरात नियम फलक लावायला पाहिजेत. अन्य राज्यामध्ये असे नियम फलक जागोजागी दिसतात. त्यामुळे पर्यंटकांचा गोंधळ होत नाही. आज गोव्याची छबी जगात ‘ड्रग्ज डेस्टिनेशन’म्हणून बदनाम होत आहे. पुढे अटल सेतु हा परिसर ‘अपघात क्षेत्र’ म्हणून कुप्रसिद्ध होणार नाही याची काळजी आतापासूनच घेतली पाहिजे.