अजून किती बळी जाऊ द्यायचे । रवी जाधवांचा प्रशासनाला सवाल ?
सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील राजवाड्यासमोर घडलेल्या घटनेमुळे दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला . सामाजिक बांधिलकी या संस्थेत काम करीत असताना शहर किंवा शहराच्या बाहेर अशी दुर्घटना घडल्यास आमची संपूर्ण टीम अशा घटनास्थळी यंत्रसामग्रीसहित पोहोचते आणि बचावकार्यात उतरते परंतु आमचं दुर्दैव असं की, अशा प्रकारच्या काही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणच्या डेंजर झोन मधील घटकांचा पाठपुरावा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून प्रशासनाला वेळोवेळी निवेदनाद्वारे केला जातो. परंतु प्रशासन याकडे कान – डोळा करते अशा तीव्र शब्दात सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केलीय . आणि याचाच परिणाम काल रात्री राजवाडा येथे घडलेली दुसरी दुर्दैवी दुर्घटना आहे. गेल्या वर्षीच्या पावसात त्याच परिसरामध्ये कोर्टाच्या बाजूचे भले मोठे झाड रस्त्यावर पडले होते परंतु त्यावेळी सुदैवाने चौघांचा प्राण वाचला होता. अशा घटना वारंवार घडू नये म्हणून त्याच रस्त्याच्या आजूबाजूला असलेली धोकादायक झाड तोडण्याचे निवेदन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पावसाआधी देऊन सुद्धा त्यावर योग्य कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही आणि आज भर सणासुदीच्या काळामध्ये निष्पाप 20/22 वय असलेल्या 2 मुलांचा बळी गेला. याला जबाबदार कोण आणि अजून अशा किती बळींची वाट पाहणार ? सामाजिक बांधिलकीची टीम अवघ्या दहा मिनिटांमध्ये यंत्रसामग्री घेऊन पोहचली व त्या भल्या मोठ्या झाडाखाली दबलेल्या त्या दोन मुलांना झाड कटरने कट करून खूप पराकाष्टेने बाहेर काढण्यात यश आलं . परंतु काही क्षणातच त्या निष्पाप जीवांचा बळी गेला होता. प्रशासनाच्या या निष्काळजीपणाच्या धोरणाने अशाच प्रकारच्या दुर्घटना- अपघात घडतच राहणार. दोन दिवस घटनेचा गाजावाजा होणार. त्यानंतर तसं चालत राहणार. पण यापुढे असं चालू देणार नाही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये याचं भान प्रशासनाने ठेवावे . कारण तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि याचाच पगार तुम्हाला मिळतोय. येथे लोकांचा जीव स्वस्त नाही आहे त्यांनाही तुमच्यासारखा परिवार आहे त्यांनाही वेदना आहेत. त्यांचा आक्रोश जवळून पहा म्हणजे कळेल. एरवी नियमावर बोट ठेवणारे प्रशासन अशा प्रकारच्या आपल्या चुकीच्या धोरणाचे समर्थन करणार का? सामाजिक बांधिलकी कधीही चुकीच्या पद्धतीने काम करत नाही तर ही संस्था लोकहित जपणारी रजिस्टर संस्था आहे. परंतु हा राग आणि तळमळ का आहे याचे कारण अशा घटना आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आणि हाताळतो देखील. ज्या फार भयंकर आणि वेदनादायक असतात. काल कोणाचं कोण गेलं माहित नाही परंतु या डोळ्यांनी पाहिलेले चित्र इतकं वेदना दायक व भयंकर होतं की रात्रभर झोप लागली नाही. कारण त्या रक्ताबंबाळ प्रेतांना मी स्वतः उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ते चित्र अजूनही डोळ्यासमोर उभं आहे कारण त्या रक्तामध्ये आम्ही भिजलो होतो. खरंच सावंतवाडीतील युवा पिढी व जनतेचे कौतुक करण्या सारखे आहे .अशा घटनांच्या वेळी सर्व एकत्र येऊन युद्ध पातळीवर काम करतात आणि प्रशासनाचे काम हलकं करतात. प्रशासनाने आता तरी जागे व्हायला हवे असे खडेबोलही त्यांनी सुनावलेत