नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या घाऊक महागाईदरात ऑगस्टमध्ये काहीशी घट झाली आहे. जुलैमध्ये 13.93 टक्क्यांवर असणारा घाऊक महागाई दर ऑगस्टमध्ये 12.41 टक्के होता. गेले 17 माहिने तो सातत्याने 10 टक्क्यांच्या वर राहिला आहे. ऑगस्टमध्ये अन्नधान्यांच्या महागाईचा घाऊक दर 9.93 टक्के राहिला आहे.
घाऊक महागाई दरात सर्वाधिक घट उत्पादित वस्तू क्षेत्रात झाली आहे. जुलैत या क्षेत्राचा दर 12.5 टक्के इतका मोठा होता. तो ऑगस्टमध्ये 7.5 टक्के राहिला. त्याचप्रमाणे इंधन क्षेत्राचा दर जुलैत 43.75 टक्के होता. तो ऑगस्टमध्ये 33.67 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. प्राथमिक वस्तूंच्या महागाई दरात जुलैत 15.04 टक्के वाढ झाली होती. ती ऑगस्टमध्ये 14.93 टक्क्यांवर आली आहे.
इंधन, अन्नधान्यांचे योगदान
ऑगस्ट महिन्यातील घाऊक महागाईदरवाढीत मुख्यतः योगदान खनिज तेले, अन्नधान्ये, कच्चे इंधन तेल, नैसर्गिक वायू, पायाभूत धातू, रसायने आणि रासायनिक पदार्थ, वीज, खाद्यान्न उत्पादने यांचे राहिले आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्याचा एक प्रयत्न म्हणून रिझर्व्ह बँकेने तीन वेळा रेपो दरात वाढक् करुन लोकांच्या हाती खेळणाऱया पैशाचे प्रमाण कमी केले आहे.