मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेवर मनसे आणि भाजपकडून रोज आरोप केले जात असताना 14 मेला उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मोठी सभा मुंबईत होत आहे.आवाज कुणाचा आणि खऱया हिंदुत्वाचा आवाज ऐकायला या अशा पद्धतीने शिवसेनेने मुंबईत जोरदार जाहिरात केली असून उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाल्यापासून शिवसेनेच्या अनेक सभा या शिवाजी पार्कवर न होता बीकेसी मैदानावर झाल्या. शिवसेनेसाठी बीकेसी हे लाभदायक असल्याचे अनेक नेत्यांनी सांगितले असून मुंबई महापालिका निवडणूकांचे रणशिंगही शिवसेना 14 मेला फुंकणार का ?
शिवसेना बाळासाहेबांचे हिंदुत्व विसरली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही जनाब सेना पासून ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणून अट्टाहास धरत विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिले. कोरोनानंतर जवळपास दोन ते अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पहिल्यांदा बीकेसी मैदानावर ‘आवाज कुणाचा’ या टॅग लाईनखाली मोठी सभा जाहीर केली आहे. राज्यात मशिदीवरील भोंगा आणि त्या भोंग्याच्या आवाजावरुन झालेला गदारोळ बघता शिवसेनेने ‘आवाज कुणाचा’ ही टॅगलाईन वापरली असावी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली आभाराची सभा ही बीकेसी मैदानात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यानंतर कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव आणि मुख्यमंत्र्यांचे आजारपण यामुळे शिवसेनेचा बहुचर्चित ऐतिहासिक दसरा मेळावा ही दोन वर्षे व्हर्च्युअल तर गेला दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात झाला होता. मोकळ्या मैदानात होणाऱया या सभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली असून राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते तसेच शिवसेनेच्या खासदारांची ही दोन वेळा बैठक स्वतः उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यामुळे शिवसेना या सभेला जोरदार शक्तिप्रदर्शन करणार यात शंका नाही, मात्र गेल्या काही दिवसापासून शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत सतत सवाल विचारला जात आहे. राणा दाम्पत्यांनी तर मुख्यमंत्र्यांना आवाहनच दिले असून रविवारी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे नवनीत राणा, एसटी आंदोलनातील वकील सदावर्ते असो किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनच सध्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. यापूर्वी अभिनेत्री कंगणा राणावतने थेट मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केले होते. मात्र मुख्यंमत्र्यांनी प्रत्येक वेळी प्रसंगी जशास तसे उत्तर तर कधी नाव न घेता टोला मारला आहे. टोमणा मारण्यात मुख्यमंत्री पटाईत असून त्यांच्या टोमण्यानेच कधी कधी विरोधक जास्त घायाळ होताना दिसतात. गेल्या आठवडय़ात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्याचे मुख्य सचिव चांगले गातात हे मला आदित्यने सांगितले. मला वाटले आजपर्यंत एकच व्यक्ती गाते असे वाटत होते असे बोलताना त्यांनी विद्यमान विराधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना नाव न घेता टोमणा मारला. तो त्यांना इतका लागला की त्यांनी यावर व्ट्टि करत उत्तर दिले. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनाही यावर बोलावे लागले. त्यामुळे विरोधक त्यांना टोमणा मुख्यमंत्री म्हणतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपून आता सर्व सुरळीत झाल्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार सभा घेतल्या. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेनंतर तर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर त्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या सभेत बाबरी मशिद पाडायला एकही शिवसैनिक तिथे नसल्याचे सांगताना बाबरी मशिद ही कारसेवकांनी पाडली. मी स्वतः त्यावेळी तिथे उपस्थित असल्याचे सांगताना थेट बाळासाहेबांच्या काळातील या घटनेबाबत सवाल उपस्थित केला. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना सध्याची शिवसेना ही बाळासाहेबांच्या नावावर त्यांचे फोटो लावून करोडो रुपये जमा करत असल्याचा आरोप केला. राज यांनी काही दिवसापूर्वी बाळासाहेबांची मशिदीवरील भोंग्याबाबतचे केलेले भाषणच आपल्या व्ट्टिर अकाऊंटवरुन टाकताना उध्दव ठाकरेंची हिंदुत्वाच्या मुद्यावरुन कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर मशिदीवरील भोंग्यांचा दिलेला अल्टीमेटम संपला त्या दिवशी तर राज यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत देशातील हिंदू बांधवांना थेट पत्रच लिहिताना जिथे जिथे मशिदीत भोंग्यावर अजान सुरू असेल त्या मशिदीबाहेर भोंग्यावर मोठय़ा आवाजात हनुमान चालीसा लावा आणि जोपर्यंत हे भोंगे उतरत नाही तोवर ही मोहीम सुरू ठेवा, असे आवाहन केले होते. याच पत्रात राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुहयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षापूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेले आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱया बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे असा सवालच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विचारला आहे. मात्र या प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील, आदित्य ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी प्रतिक्रिया दिलेली असली तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत आपली भूमिका जनतेसमोर मांडलेली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता आजारपणातून बरे होऊन राज्याच्या आणि पक्षाच्या कारभारात सक्रिय झाले आहेत. एकीकडे सरकार चालवत असताना तीन पक्षांना एकत्र घेऊन जाणे, दुसरीकडे हिंदुत्वावरुन भाजप आणि मनसेकडून केले जाणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे मुख्यमंत्र्यांची यापुढे कसोटी असणार यात शंका नाही. याच अनुषंगाने 14 मेला होणाऱया सभेत राज्यातील जनतेचा मास्क उतरवणारे मुख्यमंत्री विरोधकांचा माज या सभेत उतरवणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे