दसरा सण मोठा,नाही आनंदा तोटा असं म्हटल जातं, कारण श्रावणमास, गणेश उत्सव, पक्ष पंधरवडा, शक्तीपूजेचा नवरात्र उत्सव पूर्ण होऊन नवे संकल्प, नव्या योजना, मोहीमा यासाठी अग्रेसर होण्याचा मुहूर्त म्हणून दसऱयाकडे बघितले जाते. पाठोपाठ दिवाळीचा फराळ आणि तेजोमय प्रकाश दरवळायला लागतो. सध्याच्या काळात कोणी मुहूर्त मानत नाही आणि चैनीसाठी सण-उत्सवही लागत नाहीत. माणसे लाडू-चिवडा, मिठाई बारा महिने खातात. चाली-प्रतिचाली मोहीमा, बारा महिने आखतात. आनंद आणि आनंद असा ध्यास घेत पैशामागे धावत असतात पण दसरा-दिवाळी हे केवळ सण नाहीत ते ऋतुचक्र आहे. त्यामागे अर्थशास्त्र, निसर्गशास्त्र, आरोग्यशास्त्र आहे आणि काही परंपरा आहेत. खरीप हंगाम संपून लोकांच्या हाती पैसा आलेला असतो. नोकरदारांना बोनस मिळालेला असतो, कंपन्या लाभांश वाटतात आणि ‘आज पहिली तारीख है’ असा सर्वत्र भाव असतो. एकेकाळी दसऱयाला राजे, राजवाडे, नवीन मोहीमा आखत, सीमोल्लंघन केले जात असे. ढालगज पुढे ठेऊन राजे मिरवणुका काढत आणि आपले बळ प्रदर्शित करत. ओघानेच दसऱयाला सीमोल्लंघन, सोने खरेदी, सोने वाटप या प्रथा,परंपरा आहेत. म्हैसूरचा दसरा प्रेक्षणीय व पर्यटनदृष्टय़ा महत्वाचा मानला जातो. तर महाराष्ट्रात शिवप्रतिष्ठानच्या नवदुर्गा दौडीचा समारोप, शिवसेना दसरा मेळावा, भगवान गडावर मुंडेंची भव्य सभा, नागपुरला सरसंघचालकांचे बौध्दिक व संचलन असे अनेक उपक्रम असतात. कुठे पालखी सोहळे तर कोल्हापुरात दसरा चौकात सोने लुटणे वगैरे आनंद सोहळे असतात. यानिमित्ताने बाजाराला शक्ती मिळते. कित्येक टन श्रीखंड, बासुंदी व मिठाई खपते. सणाचा मंगल बिगुल वाजतो. पण अलीकडे हे सारे नित्याचे झाले आहे. महाराष्ट्रात शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. सडेतोड ठाकरी भाषेत सुस्पष्ट भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे गर्जना करत आणि त्यांच्या लहरी मुंबई, महाराष्ट्रसह देशभर उमटत असत. गेली दोन वर्षे कोरोना महामारीचे सावट सर्वच क्षेत्रावर व जगभर दाटले होते. माणसे माणसांपासून दूर राहत होती. संवाद हरवून भीती दाटली होती आणि जग कोंडले गेले होते. आता त्या आठवणीही नको वाटतात आणि बांधलेले जग मोकळे झाले, शाळा-महाविद्यालये सुरु झाली. यात्रा-जत्रा भरु लागल्या. वारी दुमदुमली. लग्न सोहळे होऊ लागले. सायरनचा आवाज मंदावून गणेश उत्सव, दहीहंडी उत्सव यांना उधाण आले. यांचा सार्वत्रिक आनंद असला तरी सुडाचे व कुरघोडय़ांचे राजकारण व त्याचे भुंगे भिरभिरत आहेत. बारा महिने चोवीस तास राजकारण, टिका-टिपण्या, टोमणे आणि चाली यामुळे महाराष्ट्राचे हित दुर्लक्षित होते आहे. जोडीला जनसामान्यांना आपल्या नेत्यांची किळस येते आहे. सगळे नाले तुंबलेले आहेत. दगडफेक सुरु आहे. घाणीशिवाय काहीही उडत नाही हे गेली काही वर्षे सारे जण अनुभवत आहेत. देशात महागाईने कळस गाठला आहे. रुपयांची घसरण सुरु आहे. जागतिकीकरणाचे फटके बसत आहेत. बेरोजगारी वाढते आहे. अशावेळी होणारा हा दसरा आणि सीमोल्लंघन अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. एकवेळ अशी होती की सभा, सभेची गर्दी, सभेचा माहोल आणि सभेतील वारं याला महत्व होते पण आज सोशल मीडिया, डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे सभेची परिमाणे बदलली आहेत. मुंबईचे शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे म्हणून शिवसेनेचे दोन गट मागणी करत आहेत. त्यावरुन रोज आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आव्हाने-प्रतिआव्हाने दिली जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर घेणार अशी घोषणा करत रान उठवायला सुरुवात केली आहे.‘बाप पळवणारी शिंदे टोळी’अशी संभावना आणि शक्ती दाखवणार असा इरादा जाहीर केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापाचा पक्ष व विचार विकणारा मुलगा असे म्हणत प्रतिवार केला आहे. त्यांचे हे दसरा मेळाव्याचे आणि तोही शिवतीर्थावर भरण्याचे नियोजन आहे. या दोन्ही मेळाव्यातून विचार काय मिळणार हा जसा प्रश्न आहे तसा गर्दी कोण जमवणार ही उत्सुकता आहे. तोंडावर मुंबई महापालिका निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेना गेल्यावेळी काठावर पास झाली होती. आता कडवे आव्हान आहे आणि विरोधक जोरदार आहेत. शिवसेनेचे एक नेते गजानन कीर्तीकर यांनी महाआघाडी व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सूचक विधान केले आहे. ओघानेच निवडणुकीपूर्वी कसे तट पडतात आणि निवडणुकीनंतर मंडळी कशी एकत्र येतात हे बघावे लागेल. पण त्यांची चुणूक दसरा मेळाव्यातून शक्य आहे. भाजपा एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे आणि भाजपाला ठाकरेंना जागा दाखवायची आहे. ओघानेच दसरा मेळाव्या दरम्यान मंत्रीमंडळ विस्तार आणि शिंदे गटाचा भव्य मेळावा अशी रणनिती असू शकते. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोनिया गांधींची काँग्रेस वरवर शांत वाटत असली तरी तेथेही खदखद आहेच. कॉंग्रेसचे अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. राहूल गांधींची भारत जोडो पदयात्रा कितपत यश मिळवते हे जसे महत्वाचे तसे काँग्रेसचा अध्यक्ष कोण होतो हे सुद्धा महत्वाचे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेसमध्ये अजूनही काही कण्याची व विचारांची माणसे आहेत हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही मुस्लीम विचारवंतांच्या भेटीगाठी आणि मशिदींना भेटी सुरु केल्या आहेत. त्यामागे आरएसएसची निश्चित काही भूमिका आहे. दसरा मेळाव्यात ती स्पष्ट होईल. पंकजा मुढेंना विधान परिषदेवर संधी व मंत्रीपद शक्य आहे. भगवान गडावर मेळाव्यात त्यांचे पडसाद दिसतील. एकूणच दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा हे महत्वाचे आहे. शिवतीर्थ मैदान कुणाला मिळणार हे बघावे लागेल. त्यासाठी न्यायालयात लढाई सुरु आहे. कोर्ट कुणाला अनुमती देते यावर अंदाज बांधले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाने मेळाव्यासाठी भव्य प्लॅनिंग केले आहे. खरी शिवसेना कुणाची ते बघून घ्या असे आव्हान दिले आहे. या मेळाव्याला पंतप्रधान उपस्थित राहणार अशीही चर्चा आहे. ओघानेच ‘आवाज कुणाचा’ याचा फैसला करण्याचे धोरण दिसत आहे आणि त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Previous Articleकालिदासाचे मेघदूत..एक खंडकाव्य (56)
Next Article ‘छोटय़ा बयोची मोठी स्वप्नं’ ला वाढती लोकप्रियता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.