देवरूख,प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री,संगमेश्वर-लांजा तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार,शिक्षण,कला व क्रिडाप्रेमी रवींद्र माने यांच्या पासष्टी निमित्त शिवसेना तालुका संगमेश्वर,नागरी सत्कार सोहळा समिती व रवींद्र माने मित्रमंडळाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा देवरूख येथील मराठा भवनामध्ये पार पडला. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवून माने यांचा नागरी सत्कार करण्यातआला. माजी आमदार सुभाष बने यांनी प्रास्ताविक करताना रवींद्र माने यांची जडणघडण कशी झाली, तालुक्यातील घराघरात शिवसेना कशा प्रकारे रूजवली तसेच माने यांचा तालुका प्रमुख,आमदार, राज्यमंत्री पदाचा जीवन प्रवास उलघडला. संघर्षमय जीवन त्यावर त्यांनी केलेली मात यावर देखील बने यांनी प्रकाशझोत टाकला. सुहासिनींच्याहस्ते रवींद्र माने यांचे औक्षण करून त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते भास्कर जाधव,शिवसेना उपनेते राजन साळवी,आमदार शेखर निकम,माजी आमदार सुर्यकांत दळवी, संजय कदम,शिवसेना सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य सुरेश बने, शिवसेना जिल्हापमुख विलास चाळके,आबा सावंत, बहुजन विकास आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे,माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने,जगदीश राजापकर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, रवींद्र माने यांच्या सौभाग्यवती नेहा माने,प्रद्युम माने,जिल्हा संघटक वेदा फडके,माजी जि.प.उपाध्यक्ष संतोष थेराडे,देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, बापु शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना माने म्हणाले की, यापुढे आपण कोणतीच निवडणुक लढविणार नसून,पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करणार असल्याचे जाहीर केले.मित्रमंडळीं व कुटुंबियांनी दिलेली मोलाची साथ, पक्षाच्या वरिष्ठांनी दाखविलेला विश्वास यामुळे आपण जीवनात भरारी घेवू शकलो.आज सर्व पक्षीयांनी माझा जो सत्कार केला,शुभेच्छांचा वर्षाव केला हा क्षण अविस्मरणीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो इंजिनियर घडविले आहेत.कामानिमित्त बाहेर फिरताना पटकन एखादी व्यक्ती पुढे येते व म्हणते,मी आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी.हे शब्द ऐकताच मनाला समाधान वाटते असे माने यांनी नमुद केले.
पद जनतेच्या कल्याणासाठी, सिद्द करून दाखवले-विनायक राऊत
कर्तृत्व,दातृत्व व नेतृत्व कोणाकडे असेल तर ते माने साहेबांकडे. पद आपल्या स्वार्थासाठी नसतात ती जनतेच्या कल्याणासाठी असतात हेच रवींद्र माने यांनी राजकीय कारकीर्दीत सिध्द केले असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना नमूद केले.
पक्षासाठी अहोरात्र धडपड आदर्शवत-भास्कर जाधव
अनेकांना घडविण्यात माने यांचा मोठा वाटा आहे.आपल्या राजकीय कारकीर्दीत माने यांचे मोलाचे सहकार्य आहे. मंत्रीपदाच्या कालावधीत संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात विकासाची गंगा आणली.आज कोणतेही पद नसताना माने यांची पक्षासाठी अहोरात्र धडपड आदर्शवत असल्याचे नमुद करत माने साहेबांची पहिली भेट व ओळख अशी झाली हे खुमासदार शैलीत भास्कर जाधव यांनी सांगितले. माने यांच्या पत्नी नेहा माने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. माने साहेबांच्या यशस्वीतेसाठी त्यांचा देखील मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट केले.
तसेच आमदार शेखर निकम, राजन साळवी, माजी आमदार सुर्यकांत दळवी, संजय कदम, राजेंद्र महाडीक,विलास चाळके, सुरेश भायजे, युयुत्सु आर्ते आदींनी मनोगातून रवींद्र माने यांच्या कार्याला उजाळा दिला.संघटना कशी वाढवावी, नेतृत्व कसे करावे, कार्यकर्ता कसा घडवावा यांचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माने साहेब. माने यांची पंच्याहत्तरी धुमधडाक्यात साजरी करू असे नमुद करत त्यांनी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अयुब कापडी,संतोष लाड,रूपेश जाधव,बबन बांडागळे,संजय घाग आदींनी मेहनत घेतली.