सत्तेवरून खेचल्यानंतरसुद्धा भाजपशी तडजोड न करता प्रबोधनकारांच्या वाटेने जाण्याच्या निर्णयानंतरही उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती आणि प्रतिसाद मिळत आहे. 2014 मध्ये भाजपने युती तोडली तेव्हाही सेनेला जनतेने मोठे यश दिले होते. पण, मोठी फूट पडल्यानंतर तेवढेच यश मिळेल का? सहानुभूतीचे रुपांतर मतात होईल का? हे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आणि पुढच्या निवडणुकीतून दिसणार आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर मिळालेले मशाल आणि ढाल तलवार हे चिन्ह रुजवण्याबरोबरच आपल्याच शिवसेनेच्या मागे लोकशक्ती उभी करण्याचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हान आहे. पक्षात पडलेली उभी फुट आणि मोठय़ा संख्येने आमदार, खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप बरोबर गेल्यानंतर शिवसैनिक पक्ष वाचवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी झटताना दिसत आहेत. पण, तरीही ही गर्दी निवडणुकीत यश खेचून आणू शकते का? याचे उत्तर मिळायचे आहे. शिवाय फुटलेल्या आमदार, खासदारांना मिळालेली मते शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या 70 टक्के आहेत. ही मते आमच्या पाठीशी आहेत असा दावा नुकताच शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे येत्या पोटनिवडणुकीबरोबरच महापालिका लोकसभा आणि विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेला किती मतदान होणार याची उत्सुकता आहे. लोकांच्या प्रतिसादाच्या बाबतीत मात्र उध्दव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य यांनी आघाडी घेतली असल्याचे वारंवार दिसून येत आहे. उध्दव ठाकरे जेव्हा विभागवार दौरे काढतील तेव्हा फुटीर आमदार, खासदारांच्या मतदार संघात त्यांच्यासोबत कोणती शक्ती उभी राहते, कोण प्रभावी लोक त्यांना मिळतात यावरून त्यांच्या वाटचालीची दिशा अधिक स्पष्ट होईल. पण जनतेचे प्रश्न या काळात त्यांचा पक्ष मांडतो का हे पाहणेही महत्त्वाचे आहे. परतीच्या पावसाने दिलेला तडाखा, बेळगावमध्ये कन्नड सक्ती अशा जिव्हाळय़ाच्या प्रश्नाकडे शिवसेनेचे सध्या दुर्लक्ष आहे. आपल्या पक्षाच्या अस्तित्वाबरोबरच लोकांचे अस्तित्वही 80 टक्के समाजकारणाचा गवगवा करणाऱयांनी जपले पाहिजे. ते मात्र अद्याप दिसलेले नाही.
एखादा पक्ष फुटल्यानंतर त्यामध्ये कमालीची मरगळ येते. मात्र, सेनेत उलटे घडते. शिवसेनेचे कार्यकर्ते अधिक रिचार्ज झालेले दिसले. राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतरसुद्धा तसेच घडले होते. त्यापूर्वी भुजबळ यांच्यावेळी तर उदेक झाला होता. त्यासर्वाहून मोठे आव्हान सध्या आहे. ते पेलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे उत्सुकताही आहे. जनता उध्दव ठाकरेंच्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आणि शेंडी जानवे विरहित हिंदुत्वाच्या नव्या अजेंडय़ाला साथ देणार की हिंदुत्ववादी भाजपशी फारकत घेतल्याची शिक्षा देणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, 2019 च्या निवडणुकीत मिळालेला जनादेश भाजप-शिवसेना युतीला होता असा दावा शिंदे गटाकडून वारंवार होत आहे. पण, या निवडणुकीत खरोखरच हिंदुत्ववादी मते शिवसेनेला मिळाली होती का? मिळाली असतील तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट का झाली? 2014 मध्ये स्वबळावर जिंकलेल्या जागांपेक्षा 2019 ला युती होऊनही सेनेच्या जागा का घटल्या आणि भाजपच्या का वाढल्या? याची कारणेही शोधावी लागतील. 2014 ची निवडणूक बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपश्चात झाली आणि त्यात भाजपने युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी औट घटकेला तयारी सुरू करुनही कमालीचे यश मिळवून दाखवले होते. 2016 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना असा थेट सामना झाला आणि भाजपपेक्षा एक जागा जादा जिंकून शिवसेनेने राज्यातील सत्ता पाडण्याची धमकी देऊन मुंबई महापालिकेतील आपले निसटते पण वर्चस्व राखले. त्यानंतर भाजपबरोबर सत्तेचे समीकरण जुळले. शिवसेना सत्तेत राहिली. पण, दुय्यम म्हणून कोंडीच अधिक झाली. प्रत्येकवेळी खिशातले राजीनामे दाखवावे लागले. 2019 ला युतीत विधानसभेला कमी जागांवर समाधान मानावे लागले. देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेल्या उमेदवारांना सेनेचे आमदारकीचे तिकीट द्यावे लागले आणि त्यापेक्षा कहर म्हणजे मित्र पक्षांना जागा सोडवून घेऊन तिथेही कमळ चिन्हावरच उमेदवार उभे केले गेले! या सगळय़ाचा फटका म्हणजे शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिली ते एकनाथ शिंदे आणि भाजपच्या गळाला लागून अडीच वर्षातच उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली. शिवाय, मोठय़ा पक्ष फुटीला सामोरे जावे लागले.
या सगळय़ा पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरात झालेल्या घडामोडींकडे पहावे लागेल. शिवाय उद्धव ठाकरे अशाही स्थितीत भाजपशी तडजोड करायला तयार नाहीत आणि त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात त्यांना यापूर्वीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळू लागल्याचे दिसू लागले आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे यांना हादरा मानले गेले. मात्र जेव्हा ठाकरे यांना मशाल चिन्ह देण्यात आले त्यावेळी दोन तासात सव्वा कोटी लोकांनी मशाल चिन्ह सोशल मीडियावर अपलोड केल्याची माहिती पुढे आली आहे. तेवढा प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ढाल तलवार चिन्ह मिळाल्यानंतर दिसून आला नाही. चिन्ह गोठवणे, शिवसेना पदाधिकाऱयांवर गुन्हे दाखल होणे, मुंबई क्राइम ब्रांचकडून शिवसैनिकांनी भरून दिलेल्या प्रतिज्ञापत्रांची चौकशी केली जाणे, वांदे पूर्वमधील सेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेच्या सेवेचा राजीनामा अधांतरी ठेवणे आणि त्याबाबत उच्च न्यायालयाकडून फटकारले जाणे या सगळय़ा बाबींमुळे ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती वाढत चालली आहे. लाल बावटा पक्षानेसुद्धा ठाकरेंना साथ देणे किंवा लेखक, कलाकार, पत्रकारांनी भेटून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवणे हा थेट भाजपला विरोध आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने होणाऱया वाटचालीला प्रतिसाद आहे. तो मतात कसा रूपांतरित होणार हे नजीकच्या काळात दिसेल.
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक तशी शिवसेनेसाठी तुलनेने सोपी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिका, लोकसभा आणि विधानसभेला उद्धव ठाकरे यांना कसा प्रतिसाद मिळतो, त्यांना असलेल्या सहानुभूती आणि प्रतिसादाचे रूपांतर मतात कसे होते हे पाहणे औत्सुक्मयाचे आहे. 2014 च्या गृहितकावर सध्या तरी उद्धव ठाकरे यांची वाटचाल दिसते आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना एक हजार कोटीचा दिलेला निधी ग्रामविकास मंत्री महाजन यांनी रोखल्याने सत्तेत सुरू झालेली अंतर्गत धुसफूस, मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना अपशब्द वापरणे अशा काही घटनांनी सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम होत आहे.
शिवराज काटकर