कासारी खोऱ्यात शाळा शिक्षकाविनाच : प्राथमिक शिक्षणाची वाट
करंजफेण/वार्ताहर
दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर जिह्यातील सर्व शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेश उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. परंतु शाहूवाडी तालुक्याच्या दक्षिणेकडील विशाळगड ते माळापुडे या परिसरातील काही शाळांमध्ये प्रवेश उत्सव सोडाच पण विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कायण एकही शिक्षक नसल्यामुळे त्या शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत.
जन्मलेल्या प्रत्येक बालकाला मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. हा कायदा करणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जिह्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची अशी वाईट अवस्था का निर्माण झाली याचा शोध शिक्षण विभागाने घेणे गरजेचे आहे. गत पाच वर्षापासून शाहूवाडीच्या या दुर्गम व डोंगरी भागातील शाळांमध्ये शिक्षकांच्या मंजूर पदापेक्षा निम्मी पदे कार्यरत आहेत. त्यामुळे या भागातील शाळांमध्ये शिकवणे दूरच परंतु शाळा निव्वळ सुरू ठेवणेसुद्धा उघड झाले आहे.
शिक्षकांच्या रिक्त पदामुळे तालुक्यातील पारिवने, धुमकवाडी, गवळेवाडी, ह्याव्याची वाडी येथील शाळा शून्य शिक्षकी झालेल्या आहेत. तर केंद्रशाळा अनुस्कुरा एक ते सात वर्ग, पट 85, शिक्षक एक, विद्या मंदिर बुरंबाळ एक ते सात वर्ग, पट 90 शिक्षक एक, केंद्र शाळा मांजरे एक ते सात वर्ग पट 85 शिक्षक शून्य, केंद्र शाळा येळवण जुगाई एक ते पाच वर्ग पट 40 शिक्षक एक, केंद्र शाळा करंजफेन एक ते सात वर्ग पट 250 शिक्षक चार अशी परिस्थिती शाळची झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे.
शाहुवाडी या डोंगराळ परिसरामध्ये उत्पन्नाची फारशी साधने नसल्यामुळे आर्थिक गरिबी, पालकांचे स्थलांतर, शिक्षणाबाबत जागृती नसणे या बाबींमुळे मुळातच इथली मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यातच शाळेत शिक्षकच नसल्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत या भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक मागासलेपण निर्माण आहे. शाहुवाडी शिक्षण विभागाकडून तात्पुरते कामगारी शिक्षक दिले जात आहेत. पाच वर्षापासून या परिसरातील शाळा फक्त अर्धवेळ चालवल्या जात आहेत.
हा मुळातच डोंगरी व दुर्गम असलेला भाग बदलीसाठी सुगम धरण्यात आल्यामुळे शहरी भागातून बदली होऊन येणारा कोणताही शिक्षक या परिसरातील शाळेवर हजर होत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शिक्षकांची पदे तत्काळ भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे .
चार वर्षापासून वारंवार मागणी करूनही आमच्या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळालेला नाही. आमच्या मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान आता भरून कसे निघणार. याला जबाबदार कोण?. सहदेव रोकडे, पालक, न्हाव्याची वाडी कासारी खोऱ्यातील सर्व शाळांमध्ये पुरेसे शिक्षक मिळाल्यास नाहीत तर सोमवारपासून एकही शाळा उघडू देणार नाही. सर्व शाळा बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदवणार आहे.
युवराज पाटील. सदस्य शिक्षण बचाव समिती.