वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारत आज मंगळवारी येथे ‘2026 फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या परतीच्या टप्प्यात’ अफगाणिस्तानचा सामना करणार असून यावेळी गोल नोंदविण्याच्या बाबतीत त्यांना मागील बऱ्याच काळापासून कराव्या लागलेल्या संघर्षावर ते मात करतील अशी आशा आहे. या सामन्यात सुनील छेत्री आणखी एक मोलाचा टप्पा गाठणार असल्याने त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळून राहतील. हा सामना संध्याकाळी 7 वा. सुरू होईल.
इगोर स्टिमॅचच्या भारताला 22 मार्च रोजी सौदी अरेबियाच्या आभा येथे झालेल्या दूरस्थ सामन्यात त्यांच्याहून कनिष्ठ दर्जाच्या या प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध निराशाजनकरीत्या बरोबरीवर समाधान मानावे लागले. या सामन्याने त्यांची गोलरहित वाटचाल आणखी वाढविली. भारताने शेवटचा गोल नोव्हेंबर, 2023 मध्ये कुवेतविऊद्ध केला होता. या पार्श्वभूमीवर आपला 150 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या छेत्रीने या खास प्रसंगी चमक दाखवून हा सामना संस्मरणीय बनवणे भारताच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक आहे.
2005 मध्ये छेत्री त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो आतापर्यंत 149 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याने 93 गोल केले आहेत आणि 11 चषक देशाला मिळवून दिले आहेत. आज छेत्रीने गोल करून विजय मिळवून दिल्यास आणि विश्वचषक पात्रतेची तिसरी फेरी गाठण्याची संधी वाढविल्यास भारतीय संघाचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल. कारण तिसरी फेरी गाठणे भारताला आजवर जमलेले नाही.
भारत सध्या तीन सामन्यांतून चार गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे, कुवेतपेक्षा एका गुणाने ते पुढे आहेत. कुवेतचे तीन सामन्यांतून तीन गुण झालेले आहेत. भारत अजूनही तिसऱ्या फेरीत जाऊ शकतो, परंतु गेल्या आठवड्यातील बरोबरीनंतर ते लक्ष्य खूप कठीण झाले आहे. त्यातून त्यांना फक्त एक गुण मिळाला. अफगाणिस्तान आणि नंतर कुवेत (6 जून) व कतारविरुद्धच्या (11 जून) पुढील तीन सामन्यांमधून भारताला किमान चार गुणांची गरज लागेल.
संघ तिसऱ्या फेरीत पोहोचला नाही, तर राजीनामा : स्टिमॅच
भारतीय फुटबॉल संघ 2026 फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचू शकला नाही, तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देईन, असे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी सोमवारी सांगितले. स्टिमॅच यांनी तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरण्यास आणि 2027 च्या आशियाई कपमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. ‘मी भारताला तिसऱ्या फेरीत नेऊ शकलो नाही, तर मी माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात येथे केलेल्या सर्व गोष्टींबद्दल अभिमान बाळगून सन्मानपूर्वक निघून जाईन. मी माझे स्थान दुसऱ्या कोणासाठी तरी सोडेन’, असे स्टिमॅच यांनी अफगाणिस्तानविऊद्धच्या भारताच्या ‘होम लेग’ सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सांगितले.