वृत्तसंस्था/ कोबे (जपान)
शनिवारी येथे विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियन्सशिप स्पर्धेला निरोप देण्यात आला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 15 पदकांची कमाई करत पदक तक्त्यात सहावे स्थान पटकाविले. महिलांच्या टी-12 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सिमरन शर्माने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले.
महिलांच्या टी-12 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सिमरन शर्माने 24.95 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविताना या प्रकारात आपली सर्वोत्तम जलद वेळ नोंदवली. या क्रीडा प्रकारात सिमरनने यापूर्वी 25.16 सेकंदाचा जलद वेळ नोंदवला होता. डॉमिंशियाच्या डेरलेनी सेव्हिरेनोने 25.08 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर लोरेनी गौन्सने 25.40 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले.
पुरुषांच्या एफ 46 भालाफेक प्रकारात भारताच्या भालाफेकधारकांनी रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात दुसरे स्थान मिळविणारा लंकेचा दिनेश हेराथ याच्या विरुद्ध भारताकडून रितसर तक्रार नोंदवून स्पर्धा आयोजकांकडे आपला निषेध व्यक्त केला. हेराथला या कॅटेगरीमध्ये सहभागी होण्यासाठी तो पात्र नसल्याचे भारताकडून लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा आयोजकांनी याची गंभीर दखल घेतली आणि हेराथला अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे रिंकू हुडाला दुसऱ्या स्थानासह रौप्यपदक तर अजित सिंगला तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक मिळाले. विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेच्या इतिहासात भारताची या वेळची कामगिरी ही सर्वोत्तम आहे. 2023 च्या पॅरिस येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण विक्रमी 10 पदकांची कमाई केली होती. भारतीय पॅरा अॅथलिट्सने 2024 च्या या स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचे भारतीय क्रीडा खात्यातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. 2024 च्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनने नेहमी प्रमाणे आपले वर्चस्व राखताना 87 पदकांची लयलूट केली आहे. चीनने या स्पर्धेत 33 सुवर्ण, 30 रौप्य आणि 24 कांस्यपदके मिळविली आहेत. पदक तक्त्यात ब्राझील 19 सुवर्ण, 12 रौप्य आणि 11 कांस्यपदकांसह दुसऱ्या, उझबेकिस्तान 7 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्यपदकांसह तिसऱ्या, ग्रेट ब्रिटन 7 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्यपदकांसह चौथ्या, अमेरिका 6 सुवर्ण, 13 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह पाचव्या स्थानावर आहेत. या स्पर्धेमध्ये भारतातर्फे दिप्ती जीवनजीने महिलांच्या टी-20 400 मी. धावण्याच्या प्रकारात, सचिन खिलारीने पुरुषांच्या एफ 46 गोळाफेक प्रकारात, सुमित अँटिलने पुरुषांच्या एफ 64 भालाफेक प्रकारात, टी. मरियप्पनने पुरुषांच्या टी 63 उंच उडी प्रकारात, एकता भ्यानने महिलांच्या एफ 51 क्लब थ्रो प्रकारात आणि सिमरन शर्माने महिलांच्या टी-12 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळविली आहेत. या स्पर्धेसाठी भारताने 40 सदस्यांचा चमू पाठविला होता. त्यामध्ये 8 महिलांचा समावेश होता.