वर्ष 2022 चा शेवटचा आठवडा चालू आहे, लवकरच वर्षही संपेल. आयुष्यातून गेलेले वर्ष पुन्हा कधीच परत येणार नाही, त्यासाठी ह्या वर्षांमध्ये आपण आयुष्यात किती प्रगती केली, काय चुका केल्या, केलेल्या चुका कशा सुधारता येतील, आयुष्य आणखी समृद्ध बनविण्यासाठी आणखी काय प्रयत्न केले पाहिजेत अशा सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि जे लोक आपल्या आयुष्यातील अशा जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे सिंहावलोकन करतात तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती किती सुधारली, कौटुंबिक जीवनामध्ये किती प्रगती केली, व्यवसाय-नोकरीमध्ये किती उन्नती झाली, शरीरस्वास्थ्याविषयी काय काळजी घेतली इत्यादी घटनांचा विचार करतात. निश्चितच तो केलाही पाहिजे कारण आपले पुढील वर्ष आणखी चांगले जावे म्हणून हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. याचबरोबर आपण ज्यासाठी जन्माला आलो आहोत त्यासाठी काय केले हाही विचार केला पाहिजे.
ज्या उत्साहाने आपण स्वतःच्या शरीराशी संबंधित सर्व गोष्टांrची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण ‘आत्मा’ आहोत त्यासाठी काय केले हाही विचार मनुष्याने केला पाहिजे. कारण शरीर हे नाशिवंत आहे, त्यासाठी शरीरासाठी जितके काही करू तेही नाशवंत आहे. पण ‘आत्मा’ म्हणून जे काय करू ते सर्व सनातन आहे, शाश्वत आहे. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण सांगतात (भ गी 6.5) उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः। अर्थात ‘मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रू आहे.’ याचा अर्थ हा आहे की मनुष्यजन्म महत्प्रयासाने 84 लक्ष योनी भ्रमण केल्यावर प्राप्त होतो आणि ह्या मनुष्यजन्मात आपल्या सर्व दुःखाचे कारण समजून घेऊन त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सर्व दुःखाचे मूळ कारण आहे आपल्याला पडलेला भगवान श्रीकृष्णांचा विसर. म्हणून मनाचा संयम करून भगवान श्रीकृष्णाशी आपला संबंध पुनः प्रस्थापित करणे हा आपल्या मनुष्यजन्माचा उद्देश आहे. या आध्यात्मिक मार्गामध्ये आपण किती प्रगती केली यावर आपले आयुष्य सार्थकी लागले की नाही, आपला खऱया अर्थाने उद्धार झाला की नाही हे अवलंबून आहे. म्हणून मनुष्यजीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे.
श्रीमद् भागवतमध्ये आपले आयुष्य वाया जाऊ नये यासाठी मार्गदर्शन केले आहे. मनुष्याने पशुप्रमाणे आपले आयुष्य वाया घालवू नये यासाठी शौनक ऋषी सांगतात (भा 2.3.17) आयुर्हरति वै पुंसामुद्यन्नस्तं च यन्नसौ । तस्यर्ते यक्षणो नीत उत्तमश्लोकवार्तया । अर्थात ‘सूर्य आपल्या उदय आणि अस्ताबरोबर, उत्तम श्लोक भगवंताच्या कथांची चर्चा करण्यात वेळेचा उपयोग करणाऱया मनुष्याव्यतिरिक्त, प्रत्येकाचे आयुष्य घटवितो’ जीवनाचा एकही क्षण व्यर्थ गेला तर भारंभार सोन्यानेही त्याची भरपाई होऊ शकत नाही. म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त यामधील काळ योग्य रीतीने आध्यात्मिक मूल्यांचे स्वरूप जाणण्यासाठी उपयोगात आणला नाही तर निरर्थक वाया जाईल. जिवाने आपले आध्यात्मिक स्वरूप जाणावे आणि नित्य सुखाचे उगमस्थान जाणावे यासाठी त्याला मनुष्यजन्म प्रदान केला जातो. प्रत्येक प्राणिमात्र विशेषतः मनुष्य हा आनंदाच्या शोधात असतो. पण हा आनंद आपण नश्वर अशा देहामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची परिणती अंतिमतः दुःखामध्येच होते.
यासाठी आनंदाचे मूळ असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे आपण अंश आहोत हे जाणून त्यांच्या सेवेमध्ये आपले जीवन समर्पित केल्यास आपण शाश्वत आनंदाचा अनुभव करू शकतो. श्रीमद् भागवत निक्षून सांगते की जीवन हे केवळ तथाकथित आर्थिक प्रगतीसाठी नाही किंवा भौतिक विज्ञानाच्या प्रगतीद्वारे खाणे, पिणे, उपभोग घेणे या भोगवादी तत्त्वज्ञानानुसार जगण्यासाठी नाही. अशा प्रकारचे जीवन अज्ञानी पशु-पक्षीसुद्धा जगतात. (भा 2.3.18) तरवः किं न जीवन्तिभस्त्राः किं न श्वसन्त्युत । न खादन्ति न मेहन्ति किं ग्रामे पशवो।़परे । अर्थात ‘वृक्ष जगत नाहीत काय? लोहाराचा भाता श्वासोच्छ्वास करीत नाही काय? आपल्या सभोवतालचे पशु खात नाहीत का?’ याचा अर्थ केवळ आहार, श्वासोच्छ्वास आणि मैथुन या गोष्टीचा समावेश असलेले जीवन म्हणजे मानवरूपधारी पशुवत जीवन होय. यासाठी भागवत सांगते (भा 2.3.20) बिले बतोरुक्रमविक्रमान् ये न श?ण्वतः कर्णपुटे नरस्य । जिह्वासती दार्दुरिकेव सूत न
चोपगायत्युरुगायगाथाः ।अर्थात ‘भगवंताचे सामर्थ्य आणि त्यांच्या अद्भूत कार्याविषयीची कथा ज्या मनुष्याने ऐकलेली नाही आणि भगवंताविषयीची योग्य गाथा ज्याने मोठय़ाने म्हटलेली नाही किंवा गायिलेली नाही, त्यांची कर्णरंधे म्हणजे सर्पाची बिळे आणि जिव्हा म्हणजे बेडकाची जिव्हाच असल्याचे मानले पाहिजे.’(भा 2.3.21) भारः परं पट्टकिरीटजुष्ट-मप्युत्तमाङ्गं न नमेन्मुकुन्दम्। शावौ करौ नो कुरुते सपर्यां हरेर्लसत्काञ्चनकङ्कणौ वा । अर्थात ‘शरीराचा वरील भाग जरी रेशमी मुकुटाने सुशोभित केलेला असला तरी तो मुक्तिदात्या भगवंतापुढे नतमस्तक होत नसेल तर ते एक मोठे ओझेच आहे. हात जरी चकाकणाऱया सोन्याच्या कंकणानी अलंकृत असले तरी ते भगवान हरीच्या सेवेमध्ये निमग्न नसतील तर ते मृत शरीराच्या हाताप्रमाणे आहेत’. (भा 2.3.22) बर्हायिते ते नयने नराणां लिङ्गानि विष्णोर्न निरीक्षतो ये । पादौ नृणां तौ द्रुमजन्मभाजौ क्षेत्राणि नानुव्रजतो हरेर्यौ । अर्थात ‘भगवान श्रीकृष्णांच्या प्रातिनिधिक रुपाकडे (त्यांचे रूप, नाम, गुण आदी) जे डोळे पाहत नाहीत ते मोरपिसांवर अंकित असलेल्या डोळय़ांप्रमाणे आहेत आणि जे पाय तीर्थक्षेत्री (जेथे भगवंताचे स्मरण केले जाते) जात नाहीत ते पाय म्हणजे केवळ वृक्षाचे बुंधेच आहेत’ येथे विशेषतः गृहस्थाश्रमी भक्तांसाठी अर्चा विग्रह आराधनेचा मार्ग सांगण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंबाने अर्चना विधीच्या नियमानुसार व हरिभक्तांच्या मार्गदर्शनानुसार ही सेवा करावी. अशाप्रकारे केलेल्या उपासनेमुळे गृहस्थाला आपले जीवन शुद्ध होण्यासाठी आणि आध्यात्मिक ज्ञानात शीघ्र प्रगती करण्यासाठी अत्यंत मदत होईल.(भा 2.3.23) जीवञ्छवो भागवताङ्?घ्ा्रिरेणं न जातु मर्त्ये।़भिलभेत यस्तु । श्रीविष्णुपद्या मनुजस्तुलस्याः श्वसञ्छवो यस्तु न वेद गन्धम् । अर्थात ‘ज्या मनुष्याने भगवंताच्या शुद्ध भक्ताची चरणधूळ कधीही मस्तकावर धारण केलेली नाही तो निश्चितच एक प्रेत आहे आणि ज्याने भगवंताच्या चरणावरील तुळशीपत्राचा सुगंध कधीही अनुभवला नाही तो श्वासोच्छ्वास करीत असला तरीसुद्धा प्रेतच होय.’ सारांशाने, वैदिक साहित्याचा श्रे÷ अभ्यासक, पंडित झाल्याने भगवंत प्राप्त होत नाहीत तर शुद्ध भक्तांची सेवा केल्याने त्यांच्या कृपेने भगवंत त्वरित प्रसन्न होतात.
संत तुकाराम महाराज एका अभंगात आपले आयुष्य वाया जाऊ नये म्हणून मार्गदर्शन करताना म्हणतात
ऐका गा हे अवघे जन । शुद्ध मन तें हित।।1।। अवघा काळ नये जरी । समयावरी जाणावा।।2।। नाही कोणी सवे येतां । संचिता या वेगळा ।।3।। बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रिये।।4।। कर्मभूमी ऐसा ठाव । वेवसाव जाणारा।।5।। तुका म्हणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ।।6।। अर्थात ‘अहो, सर्वजनहो, तुम्ही आपले चित्त शुद्ध करा, तेच तुमच्या हिताचे आहे असे मी तुम्हाला आग्रहाने सांगतो. सदासर्वदा आत्मानुसंधान जमणार नाही हे जरी मान्य असले तरी प्रसंगी सावधान रहावे हेच चांगले. तुमचे संचित कर्मच तुमच्या बरोबर येईल, आणखी कोणाची मदत होणार नाही. अजून तरुण आहात तोपर्यंत तुम्ही आपली इंद्रिये हरिभक्तीला अनुकूल करून घ्या आणि परमार्थ साध्य करा. या कर्मभूमीमध्ये जे प्रयत्नपूर्वक करावे ते घडू शकते हे जाणून वागा. तुकाराम महाराज म्हणतात मानवी जन्माचे दुर्लभ धन मिळाले आहे ते क्षणोक्षणी वाया जात आहे, त्याचा हरिभक्तीसाठी योग्य उपयोग करून घ्या.’ अशाप्रकारे प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यात सिंहावलोकन करावे आणि पहावे आपण हरिभक्तीमध्ये किती प्रगती केली आहे. अन्यथा आणखी एक वर्ष वाया गेल्यासारखे होईल.
-वृंदावनदास