पुणे / वार्ताहर :
येरवडा मध्यवर्ती कारागृहात अडीच हजार कैद्यांची क्षमता असून, सध्या जवळपास सात हजार कैदी बंदिस्त आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरती झाल्याने कैद्यांमध्ये वारंवार धुसफूस होण्याचे प्रकारे वाढू लागले आहेत. मागील आठवडय़ातच किरकोळ कारणावरुन कैद्यांच्या दोन गटात राडा झाला होता. त्यामध्ये चार कैदी जखमी झाले होते. तर 16 कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हौदावर पाणी भरण्यावरुन राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी न्यायालयीन बंदी प्रकाश विठ्ठल रेणुसे, विकास बाळासाहेब कांबळे, वैभव थिटे व तेजस बाळासाहेब बच्चाव या कैद्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत येरवडा कारागृहाचे शिपाई कृष्णा जयवंता वानोळे (वय 29) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर असताना कारागृहातील सीजे विभागातील पाण्याचे हौदाजवळ पाणी भरण्यावरुन चार कैद्यांचा न्यायालयीन बंदी सुजित प्रकाश टाक याच्यासोबत त्यांचा वाद झाला. त्यावेळी आरोपींनी टाक याला हाताने मारहाण करुन शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच प्लॅस्टिकच्या रिकाम्या बादल्यांनी त्याच्या डोक्यात आणि पाठीत मारहाण केल्याने तो जखमी झाला. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस काटे पुढील तपास करत आहेत.