ऑनलाईन टीम/ तरुण भारत
विधान परिषदेच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉट रिचेबल झाले. यानंतर शिवसेनेचे अनेक आमदारही नॉट रिचेबल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि शिवसेनेह महाविकास आघाडी अक्षरशः हादरली. बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेनकडून प्रयत्न केले जात आहेत. आत तर सेनेने बंडखोर आमदारांना कारवाईचा इशारा दिला आहे. अशातच आता बंडखोर आमदारांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा आवाहन केलं आहे. तुम्ही मुंबईत या, मी स्वतः एअरपोर्टवर स्वागताला येईन, असं राऊत यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं.
जो होना है वो होने दो, जो करना है करने दो, पण त्यांना मुंबईत तर यावंच लागेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, शिवसैनिक आमच्या पाठिशी आहेत. ते आमच्या एका आदेशाची वाट पाहत आहेत. पण आम्ही संयम ठेवला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर सर्वांचा विश्वास आहे असंही संजय राऊत म्हणाले.
बंडखोरांनी बाळासाहेबांचे भक्त आहोत सांगून पाठित खंजिर खुपसला, असा आरोपही राऊत यांनी केला. तसेच, बंडखोरातही बंडखोर असू शकतात. अनेक बंडखोर आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना परत यायचंय असंही राऊतांनी स्पष्ट केलं.
अडीच वर्ष मंत्रीपद भोगलं आणि मलाई खाल्ली तेव्हा त्यांना अन्याय समजला नाही का? आता अडीच वर्षांनी तुमच्यावर अन्याय झाल्याचा साक्षात्कार झाला का? ते पुढे म्हणाले की, आसाममध्ये पूर आलाय. हॉटेलबाहेर पाणी साचलंय. मृतदेह तरंगत येत आहेत. आणि हे आमदार हॉटेलमध्ये पार्टी करतायत, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.