सीमाप्रश्न पूर्ण ताकदीने सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा पदाधिकाऱ्यांनी शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान निपाणी येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्याविषयी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नाही तर चळवळीतला सत्याग्रही म्हणून सीमावासियांच्या आशा तुमच्या सोबत असून हा प्रश्न पूर्ण ताकदीने सोडवावा, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
सीमाप्रश्नासंदर्भात आपण ठोस पाऊले उचलू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. कणेरीमठ येथे झालेल्या भेटीदरम्यान इतर विषयांवरही चर्चा झाली. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कोल्हापूर येथील नियोजन मंडळाचे सदस्य राजेश क्षिरसागर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समितीचे सदस्य शुभम शेळके, मनोहर हुंदरे, रवी निर्मळकर, प्रवीण रेडेकर, युवा समिती निपाणीचे लक्ष्मीकांत पाटील, अजित पाटील, अमोल शेळके, अमोल पाटील, केतन पाटील, दीपक पाटील, सौरभ बेलवळे, अजय नार्वेकर यांसह इतर उपस्थित होते.