वृत्तसंस्था/ ओस्लो (नॉर्वे)
येथे सुरू असलेल्या पुरुष आणि महिला विश्व कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल अंशू मलिकने आपल्या वजन गटात रौप्यपदक तर सरिता मोरने कांस्यपदक पटकाविले. विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला मल्लांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
महिलांच्या 57 किलो वजन गटात सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत अमेरिकेच्या 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेती मल्ल हेलन लुसी मॅरोलिसने अंशू मलिकचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. विश्व कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारी अंशू मलिक ही भारताची पहिली महिला मल्ल ठरली आहे. 19 वर्षीय अंशूने अमेरिकेच्या हेलन लुसी मॅरोलिस बरोबरच्या लढतीत मध्यंतरापर्यंत चांगला खेळ करत 1-0 अशी आघाडी मिळविली होती. पण उत्तरार्धात हेलनने या लढतीचे चित्र पूर्णपणे पालटले. हेलनने 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर शेवटच्या काही मिनिटामध्ये अंशूवरील आपली पकड अधिक मजबूत करत आणखी दोन गुण वसुल करत सुवर्णपदक हस्तगत केले. आशियाई स्पर्धेतील अंशू ही विद्यमान विजेती आहे. विश्व कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात 2010 साली भारताचा मल्ल सुशीलकुमार हा एकमेव विश्वविजेता ठरला आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या महिला मल्ल अलका तोमरने 2006 साली, गीता फोगटने 2012 साली, बबिता फोगटने 2012 साली, पूजा धांडाने 2018 साली आणि विनेश फोगटने 2019 साली प्रत्येकी एक कांस्यपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीमध्ये स्वीडनच्या सारा जोहाना लिंडबर्गचा भारताच्या सरिता मोरने 8-0 असा एकतर्फी पराभव केला. या लढतीत मध्यंतरापर्यंत सरिता मोरने 6-0 अशी आघाडी सारावर मिळविली होती.
महिलांच्या 72 किलो वजन गटात भारताच्या दिव्या काकरनला मंगोलियाच्या देवानासन एन्ख अमरकडून पराभव पत्करावा लागला. ग्रीको रोमन प्रकारामध्ये भारताच्या पुरुष मल्लांनी साफ निराशा केली. 55 किलो गटात संदीप, 72 किलो गटात विकास, 77 किलो गटात साजन आणि 82 किलो गटात हरप्रितसिंग यांना प्रतिस्पर्ध्यांकडून सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.