नवीन जुवारी पुलाची एक लेन 19 डिसेंबरपर्यंत सुरु : आग्वाद कारागृह उद्घाटनास पंतप्रधानांना आमंत्रण,मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती
प्रतिनिधी /पणजी
येत्या विधानसभा अधिवेशनात खनिज महामंडळ विधेयक संमत करण्यात येणार असून 19 डिसेंबरपर्यंत नवीन जुवारी पुलाची एक लेन (मार्ग) चालू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दिल्ली भेटीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आग्वाद कारागृहाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आले असून ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेत सर्व पंचायतींना ऑनलाईन मार्गदर्शन करावे, अशी गळ त्यांना घातल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. त्यांनी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
दिल्ली दौरा आटोपून गोव्यात परतल्यानंतर काल मंगळवारी डॉ. सावंत पत्रकार परिषदेत बोलत होते. गोव्यातील वेगवेगळे प्रश्न, समस्या, विषय यासंदर्भात संबंधित केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सावंत यांनी दिली.
विविध केंद्रीय मंत्र्यांची घेतली भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून धनगर समाजाला एसटीचा दर्जा देण्याची मागणी केली. महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण वनमंत्री भुपेंद्र यादव, माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव, कोळसा-खाणमंत्री प्रल्हाद जोशी, आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांनाही भेटलो आणि गोव्यातील काही विषय, प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
खाण महामंडळ विधेयक संमत करणार
गोव्याची खाण फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फोटाळून लावल्यामुळे आता खनिज महामंडळ स्थापन करून किंवा खाणींचा लिलाव करून त्या सुरू करण्यावर सरकार भर देणार आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात खनिज महामंडळाचे विधेयक मांडून ते मंजूर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
जुवारी पुलाचा एक रस्ता करणार खुला
गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरण व बांधकाम याबाबत गडकरींशी चर्चा करण्यात आली असून जुवारी नवीन पुलाचा एक रस्ता 19 डिसेंबरपासून सुरू करणार, असा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ते गोव्यातील सर्व पंचायतींना (सरपंच-पंच) एक दिवस ऑनलाईन मार्गाने संबोधित करतील, अशी अपेक्षा डॉ. सावंत यांनी प्रकट केली. कोरोना लसीकरणात देशामध्ये गोवा प्रथम असल्याचा दावा त्यांनी पंतप्रधानांकडे केला. तिसऱया लाटेसाठी सज्जता केल्याचे सांगितले. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती राजेश पाटणेकर, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, खासदार विनय तेंडुलकर व इतर दिल्ली भेटीत उपस्थित होते.
खाण लिजांचे नूतनीकरण 2007 का केले नाही
यापूर्वी 2007 साली तत्कालीन सरकारने खाण लिजांचे नूतनीकरण केले असते तर 2037 पर्यंत गोवा राज्यातील खाणी चालू राहिल्या असत्या आणि त्या बंद पडल्या नसत्या, असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रकट केले. तत्कालीन सरकारने याचे प्रथम उत्तर द्यावे, अशी मागणी डॉ. सावंत यांनी केली. आमच्याकडे बोट दाखवून टीका करु नका, असेही त्यांनी सुनावले. त्यावेळी राज्याचे हित लक्षात घेण्यात आले नाही. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले म्हणून आज अशी पाळी आली आहे. खाणी सुरु करण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न केले तेवढे कोणीच केले नाहीत, असेही ते बोलून गेले. 2007 मध्ये खाण लिजांचे नूतनीकरण का झाले नाही? याची कारणे संबंधितांनी द्यावीत. का ते मुद्याम करण्यात आले नाही? अडवून ठेवले काय? असे अनेक प्रश्न डॉ. सावंत यांनी उपस्थित केले.