सुरक्षा दलांची कारवाई, चकमक सुरुच
वृत्तसंस्था/ अनंतनाग
जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी सलग दुसऱया दिवशी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. अनंतनाग जिल्हय़ातील वघामा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करत सुरक्षा दलांनी शोध अभियान सुरु केले आहे. या भागात आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या दहशतवाद्यांनी एका सीआरपीएफ जवानाची व एका पाच वर्षाच्या मुलीची हत्या केली होती.
अनंतनागमधील बिजबेहरा येथे शुक्रवार 26 रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. त्यामध्ये ही दुर्घटना घडली होती. तर सोमवारी सुरक्षा दलांनी अनंतनागमधील खुलचोहरमधील चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मसूद आणि लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते. मंगळवारीही दहशतवाद्यांनी ही मोहिम पुढे सुरु ठेवत आणखी दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. 1 जूनपासून आतापर्यंत सुरक्षा दलांनी केलेल्या धडकेबाज कारवाईत 51 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.तर या कारवाईनंतर त्राल पाठोपाठ डोडा जिल्हाही दहशतवादी मुक्त झाल्याचे सुरक्षा दलांनी म्हटले आहे.