व्हनाळी / वार्ताहर
गेल्या 40 वर्षाच्या सामाजिक राजकिय जीवनात अनेक चढउतार पाहिलेत दरम्यानच्या काळामध्ये माझ्यासह माझे निष्ठावंत कार्यकर्ते ही रक्तबंबाळ झाले, मात्र आज त्याच कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळावर शेअर्स गोळा करून सर्वसामान्यांच्या विश्वासावर कारखान्याची उभारणी केली आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत सर्वसामान्य माणसांचे योगदान बहुमूल्य असून कारखाना उभारणीत त्यांचे कार्य अतुलनीय असल्याचे प्रतिपादन अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. आम.संजयबाबा घाटगे यांनी केले. अन्नपुर्णा शुगर अॅन्ड जॅगरी वर्क्स लि.केनवडे(ता.कागल) या साखर कारखान्यांचा पहिला बॅायलर अग्नी प्रदिपन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगुडचे उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे होते.
यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी अरूंधती घाटगे यांच्या हस्ते पहिला बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न झाला. कार्यक्रमास सुयशा घाटगे, विरेनसिंह घाटगे, ए.वाय.पाटील म्हाकवेकर, काकासाहेब सावडकर, एम.टी. पोवार, विष्णूपंत गायकवाड, आदी उपस्थीत होते.
श्री घाटगे म्हणाले,” जे कारखाने गुळ पावडर निर्मिती करतात त्यांच्याकेड शिल्लक साठा राहू शकत नाही. त्यामुळेच आपन ही या कारखान्यामध्ये गुळ पावडर तयार करणार आहोत. गुळ पावडरला बाजारपेठेत चांगला दर व मागणी आहे. कारखान्यांची सर्व कामे अंतिम टप्यात आली आहेत कार्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र राहुन इतर संस्था यशाच्या शिखरावर पोहचल्या आहेत. त्याच प्रमाणे कारखाना देखील आदर्शवत करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
स्वागत व प्रास्ताविक तानाजी पाटील यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य अंबरिशसिंह घाटगे, धनराज घाटगे (वंदूर), मल्हारी पाटील (एकोंडी), दत्तोपंत वालावलकर (सेनापती कापशी), बाळासाहेब पाटील (करनुर),शंकर जिरगे (आणूर), विजय जाधव (यमगे), व्ही.जी. पोवार (सिध्दनेर्ली), तानुबाई हजारे (सिध्दनेर्ली), यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुरेश मर्दाने, आनंदराव तळेकर, शिवसिंग घाटगे, के.के. पाटील, किरण पाटील (साके) ,आण्णासाहेब इंदलकर ,अशोक पाटील,उपस्थित होते. प्रा.सुभाष पाटील यांनी आभार मानले.
अन्नपुर्णा शुगर कारखान्यासाठी सुमारे 12 हजार शेअर्स सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जमा करून कारखाना उभारणीचा पाया घातला. त्याचबरोबर ग्रामविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक मदत देत कारखान्यांच्या उभारणीमध्ये मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचे आभार संजय घाटगे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.