प्रतिनिधी/ बेळगाव
देहदान केल्यास एक व्यक्ती अनेक लोकांचे प्राण वाचवू शकते. अनेकांना अवयव न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागतात. आपले शरीर अनेकांना जीवन देऊ शकते, याचे महत्त्व लक्षात घेऊन आज खेडय़ापाडय़ातील लोकही या पवित्र कार्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. असाच संकल्प आंबेवाडी येथील वृद्ध दाम्पत्याने केला आहे.
आंबेवाडी येथील मनोहर तरळे (वय 73) आणि अनुसया तरळे (वय 69) या दाम्पत्याने मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनकडे त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार जीवनविद्या मिशनच्यावतीने शहरातील केएलई संस्थेला रितसर देहदानाचा अर्ज सुपूर्द केला.
मरणानंतर मौल्यवान देहाची राख करण्यापेक्षा तो समाजाच्या कामी आला तर यापेक्षा दुसरे पुण्य नाही, असे मत अनुसया तरळे यांनी यावेळी व्यक्त केले. लोकांनीही या समाजोपयोगी कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. देहदानाबद्दल समाजातील सर्व स्तरावरून या दाम्पत्याचे कौतुक होत आहे. यावेळी जीवनविद्या मिशनचे नामधारक व गावातील आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.