सांगली : प्रतिनिधी
देशाच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी महासैनिक दरबार आयोजित करण्यात येतो. या दरबारात दाखल केलेल्या अर्जांवर संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करून आजी, माजी सैनिंकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरावरील महासैनिक दरबाराचे आयोजन चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त), सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल़, महसूलचे अनंत गुरव आदि उपस्थित होते.
मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्राधान्य देत आहे. या समस्यांमध्ये प्राधान्याने महसूली विभागाशी संबंधित समस्या असतात. त्या तातडीने संबंधित यंत्रणांना निकाली काढण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. या महासैनिक दरबारात 17 अर्ज ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी जमिनी संदर्भातील दोन व गौण खनिज संदर्भातील दोन अर्ज निकाली काढण्यात आले. भूमी अभिलेख संबंधातील एक अर्ज, 3 कुळवहिवाट संदर्भात व सातबाराशी निगडीत अर्ज निकाली काढण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेशित करण्यात आले. जी प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत ती न्यायालयाच्या स्तरावरच निकाली निघतील. अशा प्रकरणांमध्ये महासैनिक दरबारात हस्तक्षेप केला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर वीरपत्नी, वीरमाता यानांही सहकार्य करून त्यांचेही प्रश्न निकाली काढण्याबाबत प्रशासन काम करेल. तसेच अनुकंपा नियुक्ती संदर्भात शासनाच्या आदेशानुसार व ज्येष्ठतेनुसार नियुक्ती बाबतही निर्णय घेतले जातील.