रेडी बंदराला जोडणारा मार्ग : कृषी उत्पादनाला बाजारपेठ मिळणार
वार्ताहर / आंबोली:
रेडी बंदराला जोडणाऱया संकेश्वर-रेडी आणि बेळगाव-वेंगुर्ले ऐवजी आता केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालय संकेश्वर-रेडी हा एनएच-48 हा राष्ट्रीय मार्ग काढणार आहे. हा मार्ग मुंबई-गोवा एनएच 66 आणि मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणार आहे. सुमारे 103 किमीचा हा मार्ग सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हयाला जोडणार आहे. या तीनही जिल्हय़ातील कृषी आधारित उत्पादनाला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत वाव मिळण्यासाठी हा मार्ग काढण्यात येत आहे.
विकसित होत असलेल्या रेडी बंदराला जोडण्यासाठी संकेश्वर-रेडी मार्ग काढण्यात येणार होता. परंतु या मार्गाचे काम आता मागे पडले आहे. दरम्यान हा मार्ग बांदा, वाफोली, विलवडे, सरमळे, ओटवणे, बावळाट, सातुळी, देवसू, पारपोली, आंबोली, आजरा, गडहिंग्लज संकेश्वर, कर्नाटक असा असून हा मार्ग 2-2 लेनचा असणार आहे. मात्र, सिंधुदुर्गात आंबोली घाटाच्या अडचणी आल्यास पर्यायी मार्गाचीही चाचपणी करण्यात आली आहे. या मार्गाचे काम आधीपासूनच सुरू झाले होते.
वेंगुर्ले-रेडी बंदराला जाडण्यासाठी संकेश्वर-रेडी मार्ग तसेच बेळगाव – वेंगुर्ले राष्ट्रीय मार्गाची चाचपणी करण्यात आली होती. त्याचा सर्व्हेही झाला होता. तसेच आजऱयापर्यंत काम सुरू झाले होते. परंतु आता संकेश्वर – बांदा असा एकच मार्ग काढण्यात येणार आहे. त्यासंबंधी अधिसूचना निघाली आहे. त्यामुळे रेडी मार्गाचे काम मागे पडले आहे. या नव्या मार्गामुळे आता गोव्यालाही महत्व प्राप्त होणार आहे. आता गोव्यातील बंदरातून मालाची परदेशात आयात-निर्यात होणार आहे.
बेळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्हय़ात कृषी मालाचे उत्पादन होते. विशेषत: निर्यातक्षम कृषी मालाचे हे उत्पादन होते. त्यात भाजीपाला, साखर, काजू, आंबा आदी उत्पादनांचा समावेश आहे. हा मार्ग झाल्यास कृषी माल परदेशात पाठविणे अधिक सुलभ होणार आहे. त्यादृष्टीने ही चाचपणी करण्यात आली आहे. या मार्गात आंबोली घाटाचा मोठा अडसर ठरणार आहे. तेथे वनजमीन आहे. त्यामुळे त्याला पर्यायी मार्गाचा विचार होऊ शकतो.