माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कची जहरी टीका, आयपीएलचे करार वाचवण्यात अधिक स्वारस्य असल्याचा दावा
वृत्तसंस्था / मेलबर्न
सध्याचे ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमधील आपले करार कायम रहावेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा अजिबात धक्का बसू नये, याची इतकी काळजी घेतात की, ते अगदी भारतीय कर्णधार विराट कोहली व त्याच्या अन्य सहकाऱयांविरुद्ध स्लेजिंग करण्याचे टाळतात, अशी जोरदार टीका माजी कर्णधार मायकल क्लार्कने केली. एरवी भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंत आजवर बऱयाचदा संघर्ष झडला आहे, प्रचंड ताणतणाव निर्माण झाला आहे. पण, आता आपल्या क्रिकेटपटूंच्या स्वार्थी क्रिकेटमुळे ती रंगतच निघून गेली आहे, असा क्लार्कचा दावा आहे.
‘भारताचे जागतिक क्रिकेटवर कसे अधिराज्य आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अव्वल आहे. पण, प्रथमश्रेणी स्तरावर आयपीएलसारखी दुसरी स्पर्धा अद्याप झालेली नाही. आयपीएलमधून मिळणारे गलेलठ्ठ पॅकेज प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूला हवे आहेत. त्यामुळे, एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांना डिवचणे टाळतो’, असे क्लार्क म्हणाला.
‘विराट कोहलीसह किंवा त्याच्या अन्य सहकाऱयांसह एप्रिलमध्ये आयपीएल खेळायचे आहे, हेच आपल्या खेळाडूंच्या नजरेसमोर असते. त्यामुळे, ते कोणत्याही किंमतीवर स्लेजिंग करत नाहीत, हे खरे दुखणे आहे. एरवी आपले बरेच खेळाडू अन्य देशांविरुद्ध खेळताना बरेच आक्रमक असतात, ते स्लेजिंगही करतात. पण, हीच लढाऊ प्रवृत्ती भारताविरुद्ध खेळताना दिसून येत नाही’, अशी खंत त्याने पुढे व्यक्त केली.
‘सध्याचे आपले सर्व खेळाडू विराट किंवा त्याच्या अन्य सहकाऱयांच्या माध्यमातून आयपीएलचे करार कसे पदरात पाडून घेता येईल, यावरच मुख्य लक्ष केंद्रित करुन असतात. विराटने बेंगळूर संघात घेतले तरच 6 आठवडय़ांच्या कालावधीत मला 1 दशलक्ष डॉलर्सचे मानधन मिळेल, हे त्यांच्या मनात असते. माझ्या मते आपले क्रिकेटपटू भारताविरुद्ध खेळताना आता खूपच मवाळ झालेले दिसतात. आपली आक्रमकता दिसणार नाही, याचीच काळजी घेत असल्यासारखी त्यांची देहबोली असते’, अशी टीका त्याने यावेळी केली.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने वाद रंगत आले असून यामुळे अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धासारखी परिस्थिती तर अनेकवेळा उद्भवली आहे. यामध्ये 2007-08 व 2018 मधील दौऱयाचा प्राधान्याने समावेश होतो. 2008 मध्ये मंकी गेट वाद निर्माण झाला तो उभय संघातील तणावाचा सर्वोच्च बिंदू मानला जातो.