आजच्या जगातही स्त्रियांना आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचे, अस्मितेचे आणि सन्मानाचे प्रश्न सतावत असतात. ते सोडवण्यासाठी आधी ते समजून घ्यावे लागतात आणि प्राप्त परिस्थितीत त्यांचा सामना कसा करायचा, याबद्दल काही निर्णय घ्यावे लागतात. पाकिस्तानी मुळाची अमेरिकास्थित लेखिका सादिया अब्बास हिच्या ‘दि एम्प्टी रूम’ नव्या कादंबरीत तिने अगदी आजच्या नव्हे, पण सत्तरच्या दशकातल्या एका पाकिस्तानी विवाहित चित्रकार महिलेच्या जीवनातून तेथील तत्कालीन जीवनाचं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीच्या ‘जुबान बुक्स’ या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रसिद्ध केलं असून, दक्षिण आशियाई साहित्यासाठी असलेल्या 2019च्या डीएससी पुरस्कारासाठी या कादंबरीचं नामांकन झालं आहे. ताहिरा ही पुरुषी वर्चस्वाच्या विशिष्ट चौकटीत सापडलेली आहे. त्यातून तिची सुटका नाहीच. नवरा शहजाद आणि तिचं सहजीवन त्याकाळच्या इतर जोडप्यांप्रमाणेच. नवऱयाला पुरुष म्हणून असलेला जन्मसिद्ध अधिकार मान्य करत ताहिराचाही संसार चाललेला. मानसिक दबाव, तणाव आणि निराशा यामुळे त्रस्त असलेल्या ताहिराला चित्राच्या कॅनव्हासवर दिलासा सापडतो. त्यावरचे रंग, स्वतःच्या भावना या पटावर ओतून मनाला मिळणारा आनंद यात ती आपली मुक्ती शोधण्याचा प्रयत्न करते. पुरुषाची व एकूणच समाजाची स्त्रीकडे बघण्याची विशिष्ट दृष्टी, स्त्रीद्वेष्टेपणाची तिला असलेली सुस्पष्ट किनार ताहिरा अनुभवत आहे. तिच्या कहाणीबरोबरच इतर पाकिस्तानी महिलांचं जीवन, तत्कालीन काळातील कला व साहित्यामधील तरंग व पडसाद असं बरंच काही या कादंबरीत वाचायला मिळतं…
सुमारे दहा वर्षांचा कालखंड चित्रित करणारी ही कथा पाकिस्तानातल्या लष्करशाहीच्या कालखंडात घडते. त्या काळातली हिंसा आणि पुढच्या काळातील विस्कळीत आणि हिंसक वास्तवाची त्यात दडलेली बीजं हेही सारं यात आहेच. तसंच उर्दू साहित्यातील जुने-नवे संदर्भ, कुर्रतुलैन हैदर, इस्मत चुगताई यांचे उल्लेख यात आहेत. तसंच भारतातील उत्तर प्रदेशातून पाकमध्ये आलेल्या लोकांची कराचीतली वस्ती आणि त्यांचं जीवन व समस्या यांचीही चर्चा आहे. लेखिकेचे वडील मूळचे उत्तर प्रदेशातले असल्याने, ते तिथल्या मातीचे पुत्र (पंजाबी) ठरत नव्हते आणि म्हणून त्यांच्यावर नोकरी गमावण्याची पाळी आली होती. आपली स्वतःची भूमी म्हणून पाकिस्तानात आलेल्या त्यांच्यासारख्या अनेकजणांचा तो भ्रमच ठरला होता. अशा अनेक संदर्भांसह ही कादंबरी ताहिराची गोष्ट सांगते. स्थितिवादी ताहिरा जगण्याशी तडजोड करते आणि आपल्या कलेतून मोकळा श्वास शोधते…
लेखिका सादिया अब्बास ही स्वतः 80च्या दशकात वयाच्या सहाव्या वषी पाकिस्तानात राहायला आली. त्यापूर्वी तिचं वास्तव्य सिंगापूर इथं झालं होतं. तिला स्वतःलाही घरात बंधनांचा जाच होता. तिला शिक्षणासाठी परदेशी पाठवू नये, असं नातेवाईक म्हणत. पण तिला परदेशी शिकायला जायला मिळालं आणि तिचं जग विस्तारलं. पाकिस्तानबाहेरच्या माणसाशी विवाह करणारी आणि घटस्फोटही घेणारी, तिच्या कुटुंबातली तीच पहिली. विशिष्ट वातावरणात वाढूनही, स्वतःला त्यातून बाहेर काढणारी सादिया अब्बास सतत मोकळय़ा श्वासाचा शोध घेणारी आणि स्वतःचा आवाज ऐकणारी आहे. प्रस्तुत कादंबरीत मात्र तिने लग्नाची चर्चा आणि चित्रण करताना मागच्या काळातील विशिष्ट परिस्थितीत स्त्रीच्या वाटय़ाला येणाऱया रिकाम्या जीवनाचं दर्शन घडवलं आहे. आजच्या काळात पाकिस्तानातली स्त्री खूप जागरूक बनली आहे आणि स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून ती लढायलाही तयार आहे. आजचं हे चित्र सादियाला आश्वासक वाटतं. या कादंबरीतल्या ताहिराप्रमाणे केवळ कलेत स्वतःपुरती मानसिक मुक्ती शोधणं हा काही उपाय होऊ शकत नाही. हे सादिया अब्बासलाही माहीत आहे. पण तिने निवडलेल्या काळातली ताहिरा ही एका विशिष्ट परिस्थितीची बळी आहे. स्त्रीला चौकटीत अडकवणारा आणि बंधनात जखडणारा माहौल तिच्या अवतीभवती आहे. स्त्रीचं याप्रकारचं दमन करणाऱया वास्तवावर बोट ठेवणारं हे लेखन आहे.
स्वतःच्या हक्कासाठी, आनंदासाठी स्त्रीला दुसऱयाशी लढावं लागतं, टक्कर द्यावी लागते. प्रसंगी स्वतःलाही समजावावं लागतं. अलीकडेच झळकलेला आश्विनी अय्यर तिवारी हिचा ‘पंगा’ हा कंगना राणावतने मुख्य भूमिका साकारलेला चित्रपट अशा एका स्त्रीची कहाणी सांगतो. हसतखेळत आव्हानांचा सामना करणारी नायिका कंगनाने यात रंगवली आहे. अश्विनीने यापूर्वी ‘निल बट्टे सन्नाटा’, ‘बरेली की बर्फी’ असे उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
एका महिला खेळाडूची प्रत्यक्ष कहाणी आहे ही. आपण कबड्डीसारखा खेळ निवडला, याला कारण हा खेळ अजिबात महागडा नाही. तो साध्या कपडय़ांमध्ये, अगदी साडीतही खेळता येतो, असं दिग्दर्शिका म्हणते, ते खरंच आहे. कबड्डीच्या क्षेत्रातली आंतरराष्ट्रीय स्तरावरली खेळाडू विवाहानंतर आपल्या संसारात रमते. घराची, मुलांची जबाबादारी सांभाळते. वयाच्या तिशीत तिला आपल्या खेळाकडे पुन्हा एकदा वळावंसं वाटतं. वय थोडं वाढलेलं आणि संसाराची जबाबदारी अशा स्थितीत ती साऱया गोष्टींना कशी सामोरं जाते, याची ही कहाणी आहे…समाजात, घरात, कुटुंबात सगळय़ांच्या भूमिका या ठरलेल्या असतात. त्यातही विशिष्ट पद्धतीने वागण्याची जबाबदारी स्त्रीवर टाकलेली असते. एकदा लग्न झाल्यावर, तिने मागचं सारं विसरावं, स्वतःच्या नावापासून आवडी निवडी आणि नावडींपर्यंत सारं काही बाजूला ठेवावं, असं अपेक्षित असतं. पण या सगळय़ावर मात करणारी नायिका ‘पंगा’ मधून भेटते.
जया निगम ही कबड्डीपटू आहे आणि ती आपल्या खेळातील कौशल्याच्या जोरावर भारतीय टीमची कॅप्टनही बनते. दरम्यान तिचं लग्न होतं. कबड्डीचा महत्त्वाचा होणार असतो, त्याचवेळी ती गरोदर असल्याचं समजतं. आपण या सामन्याला जाऊ आणि लगेच परतू, असं आश्वासन घरच्यांना देऊन ती जायला निघते. पण तिची वेळेआधी प्रसूती होऊन तिच्या मुलाचा जन्म होतो. या मुलाची काळजी नीटपणे घेतली नाही, तर त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही, असं डॉक्टर बजावून सांगतात. मग जयाला आपलं स्वप्न विसरावं लागतं आणि आकांक्षेवर पाणी सोडावं लागतं. काही वर्षांनी तिच्यासोबत टीममध्ये केळणारी एक मैत्रीण तिला भेटते, जी अद्याप कबड्डीचे सामने खेळत असते. ते पाहून जयाची खेळण्याची ऊर्मी जागी होते. तिचा मुलगाही आपल्या आईने कबड्डी खेळावं असा आग्रह धरतो. आपल्या वडिलांनाही तो पटवतो. जयाला स्वतःलाच खात्री वाटत नाही, कारण तिचं वय जास्त असतं. नवरा तिला सांगतो की तू पुनरागमन करण्याचं नाटक कर. खेळायला जा, आणि महिनाभराने, आपली निवड झाली नाही, असं आदीला (म्हणजे मुलाला) सांग. ती तसंच करायचं ठरवते. ती सरावाला जाते, तेव्हा सुरुवातीला खूप जड जातं. पण नंतर तिला त्यात उत्साह वाटू लागतो आणि आपण आजही खेळू शकतो, इतकंच नाही, तर हेच आपलं जीवन आहे, हे तिला पटतं. नवऱयालाही ती सांगून टाकते की मला खेळायचं आहे, सामन्याच्या चमूत सामील व्हायचं आहे. तिला या साऱया प्रक्रियेत तिला तिच्या कुटुंबातल्या मंडळींची मदत होते, हेही महत्त्वाचं.
आपल्याकडे विशेषतः क्रीडाक्षेत्रात विवाहानंतर कमी महिला टिकून राहतात. मुळातच मुलींनी खेळात कमी लक्ष घालावं असं घरच्यांचं मत असतं. हे चित्र व्यापक प्रमाणात बदलणं गरजेचं आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणेइतकीच ‘बेटी खिलाओ’ हे वाक्मयही महत्त्वाचं आहे. आज सानिया मिर्झा बाळंतपणानंतर दोन वर्षांनी टेनिस खेळायला लागली आहे. सेरेना विल्यम्सनेही हाच धडा घालून दिला होता. लग्नानंतर आणि अपत्य जन्मानंतरही स्त्री खेळू शकते, हे सिद्ध करणारी मेरी कोम ही आणखी एक भारतीय महिला खेळाडू. जीवनात अडचणी या येतातच, पण त्यांचा सामना करून, त्यांच्याशी पंगा घेऊनच त्यांच्यावर विजय मिळवावा लागतो. मग तो खेळ असो, की प्रत्यक्ष आयुष्यातली एखादी समस्या. कारण आयुष्य हाही शेवटी अटीतटीचा खेळच आहे.
नंदिनी आत्मसिद्ध