माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची टिका, ओबीसींना सरसकट 30 टक्के आरक्षण देण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली दखल न घेतल्याची खंत
प्रतिनिधी / सांगली
जातीवर आधारित आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे. भविष्यात भाजपला याचा पश्चाताप होईल, अशी टिका माजीमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली. ओबीसींना सरसकट 30 टक्के आरक्षण देण्याची मागणीही केली.
यापुढे सक्रीय राजकारणात येणार नसल्याचे सांगून राष्ट्रवादीनेही तीन वर्षे वगळता दखल घेतली नसल्याची खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, ओबीसींना शिक्षण, राजकारण, नोकऱ्यांसह सर्वच क्षेत्रात 30 टक्के आरक्षण, स्वतंत्र जनगणना झालीच पाहिजे. ओबीसीमध्ये धनगरसह 32 पोटजातींचा समावेश होता. परंतु 1978 साली वसंतदादा मुख्यमंत्री असताना खाटीक, वैदू आणि डंगे या तीन धनगर पोटजातींचा एससीमध्ये समावेश केला. 29 पोटजाती ओबीसीमध्येच आहेत. जनगणनेवेळी पोटशाखेची नावे लावल्यामुळे मराठा समाजानंतर राज्यात सर्वाधिक असलेल्या धनगर समाजाची लोकसंख्या 1 कोटी 10 लाख सांगितली जाते. समाजाने पोटशाखांऐवजी धनगर असेच जनगणनेवेळी सांगावे, असे आवाहनही केले.
शेळी मेंढी महामंडळाची उपेक्षा नको
धनगरांचा शेळ्या मेंढ्या हा जागतिक पातळीवरील व्यवसाय आहे. पूर्वी या व्यवसायाला राजाश्रयही होता. परंतु सध्या उपेक्षा आणि सरकारच्या दुर्लक्ष यामुळे 80 टक्के लोक या व्यवसायातून बाहेर पडले. त्यापैकी 70 टक्के लोक मुंबईत हमाली कामात आहेत. केवळ धनगर म्हणून शेळीमेंढी महामंडळाची उपेक्षा नको. या महामंडळाला दरवर्षी 1 हजार कोटीची गरज आहे. आघाडी सरकारने या महामंडळाला काहीच दिले नसल्यगची नाराजीही व्यक्त केली.
मेंढपाळावरील अत्याचाऱयांवर ऍट्रॉसिटी करा,
मेंढपाळांना मारहाण, मेंढ्या चोरणे, महिलांवर अत्याचाराचे सर्रास गुन्हे राज्यात घडत आहेत. ते पोलीस आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संगनमताने होत असल्याने मेंढपाळावरील अत्याचार दडपले जातात. यापुढे असे अत्याचार करणाऱ्यांवर ऍटॉसिटी कारवाईची मागणीही केली. ओबीसी समाजातील शेळीमेंढी पालकांना अनुदान मिळावे, ओबीसींच्या विद्यार्थ्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर शासनाने वसतीगृहे बांधावीत, शेळी मेंढी पालन व्यवसायाचे पुनर्जीवन करावे, आदी मागण्यांही डांगे यांनी केल्या.
यापुढे राजकारणात नाही
भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद दिले. परंतु भाजप सरकार येताच राजीनामा दिला. या काळात पंढरपूर देवस्थानमध्ये क्रांतीकारी कामे केली. पण तीन वर्षानंतर राष्ट्रवादीने दखल घेतली नाही. आपण यापुढे राजकारणात जाणार नाही. धनगर आणि ओबीसींच्या अस्मिता जागृत करण्यासाठी काम करणार आहोत.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे
मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट न करता स्वतंत्र आरक्षण देण्याची आपली मागणी आहे. ओबीसीसाठी केंद्र सरकारने 27 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. पण घटनेने दिलेले 30 टक्के आरक्षण मिळावे, ओबीसींची जातवार जनगणना ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मतही डांगे यांनी व्यक्त केले.