रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला यंदाही आयपीएल जिंकता येणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर 8 वर्षांपासून या संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत असलेल्या विराट कोहलीवर प्रचंड टीका होत आली आहे. केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीरने आरसीबी संघव्यवस्थापनाने आता विराटच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे, असे नमूद केले होते. भारताचा माजी सलामीवीर व गंभीरचा तत्कालीन सहकारी विरेंद्र सेहवागने मात्र कोहलीची पाठराखण केली असून त्याला आरसीबी संघातून वगळण्याची गरज नाही, असे ठामपणे नमूद केले आहे.
आरसीबीने यंदा चार वर्षात प्रथमच प्ले-ऑफमध्ये स्थान संपादन केले. पण, यानंतरही यंदाचे वर्ष त्यांच्यासाठी शक्य तितक्या लवकर विस्मरणात जाणारे ठरावे, असेच चित्र राहिले. एकवेळ अव्वल राहिलेल्या आरसीबी संघाला नंतर दुसऱया फेरीत स्थान प्राप्त करण्यासाठी सरस धावगतीच्या निकषावर अवलंबून रहावे लागले. साखळी फेरीत आरसीबीला सलग 4 वेळा पराभवाचे धक्के सोसावे लागले आणि त्यानंतर बाद फेरीतील लढतीत सनरायजर्स हैदराबादने आरसीबीचा हंगामातील प्रवास संपुष्टात आणला.
आरसीबीच्या या एकंदरीत कामगिरीचे विश्लेषण करताना माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर व संजय मांजरेकर यांनी विराटला नेतृत्वावरुन वगळण्याची गरज असल्याचे प्रँचायझीला उद्देशून म्हटले. 32 वर्षीय विराट कोहली 2013 पासून आरसीबी संघाचे एकहाती नेतृत्व करत आला असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाचे प्रदर्शन अतिशय खराब स्वरुपाचे राहिले आहे. त्यांना या कालावधीत केवळ एकदाच अंतिम फेरी गाठता आली आहे.
माजी भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवागने मात्र गंभीर व मांजरेकर यांच्याशी सहमती दर्शवलेली नाही. ‘विराटला नेतृत्वावरुन डच्चू देणे हा पर्याय ठरु शकत नाही. त्याच्याऐवजी आरसीबी व्यवस्थापनाने संघात अन्य सुधारणा करण्यावर भर द्यावा आणि विराटला नेतृत्वावर कायम ठेवावे’, असे सेहवागचे मत आहे.
‘कोणत्याही कर्णधारासाठी संघ उत्तम असणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे, त्यांच्या व्यवस्थापनाने नेतृत्वबदलाचा अजिबात विचार करु नये. याशिवाय, संघात कशा सुधारणा करता येतील, यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावे. तसे पाहता, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघाकडे स्थित अशी फलंदाजी लाईनअप होती. पण, आरसीबीकडे मात्र त्याचा अभाव होता. केवळ एबी डीव्हिलियर्स व विराट कोहली यांच्या फलंदाजी क्रमात बदल इतकाच प्रयोग आरसीबीने केला. या संघाकडे पडिक्कल आहे. त्यामुळे, त्यांनी आणखी एक सलामीवीर व तळाच्या क्रमवारीत उत्तम फलंदाज तैनात करणे उपयुक्त ठरेल. हे पाच फलंदाज सामने जिंकून देण्यासाठी पुरेसे ठरतील. याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या भारतीय गोलंदाजांवर अधिक भरवसा ठेवावा’, असे सेहवाग शेवटी म्हणाला.