आसामचे मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांची पाठराखण
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात सुरू असलेले चकमकींचे सत्र योग्य ठरविले आहे. गुन्हेगारांनी कोठडीतून पळण्याचा प्रयत्न केला किंवा पोलिसांकडून शस्त्र हिसकाविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गोळी झाडण्याचा पॅटर्न असायला हवा असे शर्मा यांनी म्हटले आहे. अलिकडेच कोठडीतून पलायनाचा प्रयत्न करणाऱया गुन्हेगारांसोबत पोलिसांच्या होणाऱया चकमकींच्या वाढत्या संख्येने आसाममध्ये राजकीय वाद उभा राहिला आहे.
मुख्यमंत्री शर्मा यांनी राज्यातील सर्व पोलीस स्थानकांच्या प्रभारी अधिकाऱयांसोबत पहिल्यांदाच आमने-सामने बैठक घेतली आहे. एखादा आरोपी पोलिसाचे शस्त्र हिसकावून पळत असल्यास पोलिसांनी त्याच्या छातीवर गोळी मारण्याची गरज नाही, पण त्याच्या पायांवर गोळी मारू शकतात. आसाम पोलिसांना भीती बाळगण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात चकमकींच्या घटनांचा एक पॅटर्न तयार होत असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर गुन्हेगार पळत असल्यास यात (गोळीबार) पॅटर्न असायला हवे असे उत्तर दिले. कायद्याने पोलिसांना आरोपी किंवा गुन्हेगारांवर गोळय़ा चालविण्याची अनुमती दिली आहे. पण याकरता आरोपीने प्रथम गोळीबार केला असावा किंवा तो पलायन करण्याच्या प्रयत्नात असणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आमचे काम लोकांच्या भल्यासाठी आहे का स्वतःच्या हितासाठी हे मात्र संबंधिताने स्वतःच्या मनाशी स्पष्ट करावे. एका सामान्य प्रक्रियेच्या अंतर्गत आरोपीवर आरोपपत्र दाखल करून दोषी ठरविण्यात येईल. पण जर कुणी पलायनाचा प्रयत्न करत असल्यास आम्ही झिरो टॉलरेन्सची भूमिका स्वीकारणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले.
लोकशाहीत गुन्हय़ाचा सामना कायद्याशी होतो, चकमकीशी नाही. अन्य कुठलाच पर्याय नसल्यास चकमक घडत असते. राज्यात मे महिन्यापासून आतापर्यंत किमान 12 संशयित उग्रवादी आणि गुन्हेगार चकमकींमध्ये मारले गेले आहेत, कारण त्यांनी कथितरित्या कोठडीतून पळण्याचा प्रयत्न केला होता. तर बलात्काराचे आरोपी आणि पशुतस्करांसह अनेकजण चकमकींमध्ये जखमी झाल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे.