उभय संघातील चौथी व शेवटची कसोटी आजपासून
अहमदाबाद / वृत्तसंस्था
इंग्लंडच्या काही आजी-माजी क्रिकेटपटूंनी फिरकीला पोषक खेळपट्टीबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली असली तरी आजपासून (गुरुवार दि. 4) खेळवल्या जाणाऱया चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांना पुन्हा एकदा फिरकीचाच चक्रव्यूह रचणार आहे. यापूर्वी, याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लिश संघाचा धुव्वा उडवला, त्याची येथेही पुनरावृत्ती करण्याचा संघाचा निर्धार असेल. येथे पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चितीसाठी भारताला इंग्लंडविरुद्ध ही शेवटची कसोटी अगदी बरोबरीत राखली तरी ते पुरेसे ठरणार आहे. पण, कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मात्र संघाचे आक्रमक इरादे असतील आणि विजयाच्या निर्धारानेच संघ मैदानात उतरेल, असे स्पष्ट केले आहे. भारतीय संघ कोणत्याच स्थितीत बचावात्मक खेळणार नाही, याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
यापूर्वी, तिसऱया कसोटी सामन्यात भारताने दोनच दिवसात इंग्लिश संघाचा 10 गडी राखून अक्षरशः धुव्वा उडवला आणि या पार्श्वभूमीवर अजिंक्य रहाणेने दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा फिरकीला पोषक खेळपट्टी असेल, असे सांगत इंग्लंडच्या मार्गातील अडथळे काय असतील, हेच जणू अधोरेखित केले आहे. अक्षर पटेलने ‘स्टम्प टू स्टम्प’ मारा करत इंग्लिश फलंदाजांना जवळपास प्रत्येक चेंडू खेळणे भाग पाडले आणि त्याची ही रणनीती चांगलीच फळली होती. त्याचीच पुनरावृत्ती येथील चौथ्या व शेवटच्या कसोटीतही झाल्यास त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
कोहलीसमोर आव्हान
सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंड बरोबरीसाठी प्रयत्नशील असेल. मात्र, भारताचे आव्हान तगडे असेल, याची त्यांना मागील दोन कसोटीत उत्तम प्रचिती आलेली आहे. कोहली भारताच्या यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक असला तरी आयसीसी इव्हेंट्समध्ये धोनीइतके यश मिळवता आलेले नाही, हे त्याने यापूर्वी मान्य केले आहे. पण, आता कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ती कसर काही प्रमाणात भरुन काढण्याचा त्याचा प्रयत्न असून यात अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन हे त्याचे मुख्य अस्त्र असणार आहेत. अक्षर व अश्विन यांनी या मालिकेत आतापर्यंत 42 बळी घेतले आहेत.
जसप्रित बुमराहने वैयक्तिक कारणास्तव चौथ्या कसोटी सामन्यातून अंग काढून घेतले असल्याने येथे उमेश यादव संघात परतण्याची चिन्हे आहेत. उमेश यादवचा साथीदार मोहम्मद सिराज असेल की इशांत हे अजून निश्चित होणे बाकी आहे.
इंग्लंडला खराब फॉर्मची चिंता
एकीकडे, भारतासाठी रोहित शर्मा वगळता अन्य एकही फलंदाज सातत्य दाखवू शकलेला नसताना दुसरीकडे, इंग्लंडचा संघ देखील खराब फटक्यांच्या निवडींमुळे सातत्याने अडचणीत येत राहिला असल्याचे चित्र आहे. जो रुटने (333) पहिले कसोटी द्विशतक झळकावल्यानंतर धावांचा रतीब रचला असला तरी त्याच्यात व सर्वाधिक धावा जमवणारा दुसरा फलंदाज बेन स्टोक्स यांच्यात तब्बल 187 धावांचे अंतर आहे. स्टोक्सने आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यात 146 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडे दुसरा स्पेशालिस्ट फिरकीपटू उपलब्ध नाही, ही देखील त्यांची मुख्य अडचण ठरत आली आहे. जो रुटने 8 धावात 5 बळी मिळवले असले तरी त्याच्यावरच प्रत्येक वेळी अवलंबून राहता येणार नाही, याची इंग्लिश व्यवस्थापनाला उत्तम जाण आहे.
इंग्लंडचा पहिल्या पसंतीचा फिरकी गोलंदाज जॅक लीचने आतापर्यंत 16 बळी घेत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचा प्रयत्न केला. पण, पुन्हा एकदा त्याच्यावरच इंग्लंडला पूर्ण विसंबून रहावे लागेल, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. इंग्लंडचा जलदगती चमू एरवी भेदक गोलंदाजी साकारतो, हा इतिहास आहे. यंदा भारतातील मालिका मात्र त्याला आतापर्यंत अपवाद ठरत आली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, केएल राहुल.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
सामन्याची वेळ ः सकाळी 9.30 पासून.
जागतिक चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी…
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाच्या दृष्टीने ही लढत विशेष महत्त्वाची असणार आहे. इंग्लंडचा संघ जूनमध्ये खेळवल्या जाणाऱया अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र, आता न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी कोण असेल, हे या लढतीच्या माध्यमातून स्पष्ट होईल. भारताने इंग्लंडविरुद्धची ही शेवटची लढत जिंकली किंवा अगदी बरोबरीत राखली तरी भारताचे फायनलमधील स्थान निश्चित होईल. पण, भारताला धूळ चारण्यात इंग्लंडला येथे यश प्राप्त झाले तर मात्र यामुळे भारताचे जागतिक कसोटी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल व जूनमध्ये न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया हे फायनलमधील प्रतिस्पर्धी संघ असणार आहेत.
अहमदाबादेतील वाढत्या उष्म्याने इंग्लिश खेळाडू हैराण
चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यात भारताला जेरीस आणण्याचा इंग्लंडचा इरादा असेल तर यात आश्चर्याचे कारण नाही. पण, सध्या अहमदाबादमधील चटका देणाऱया तापमानाने इंग्लंडच्या खेळाडूंनाच सर्वप्रथम जेरीस आणले आहे. सध्याचे येथील तापमान 35 ते 37 डिग्री सेल्सियसपर्यंत इंग्लंडचे साहायक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड, कर्णधार जो रुट यांनी वाढत्या उष्म्याने आपले बहुतांशी खेळाडू हैराण झाले असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. इंग्लंडचा संघ या मालिकेत तूर्तास 1-2 फरकाने पिछाडीवर असून रोटेशन पॉलिसीमुळे जोस बटलर, मोईन अली यांच्यासारखे पहिल्या पसंतीचे खेळाडू येथे उपलब्ध नाहीत, ही त्यांची मुख्य चिंता आहे.