वार्ताहर / बिबी
पुणा पंढरपूर राज्य महामार्गावरील पालखी मार्गावर सुरभी हॉटेल व साधुबुवा मंगल कार्यालय राजुरी (ता. फलटण) येथे इंडिका कार व ऊस वाहतुक करणाऱया ट्रक्टर यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात मोहन महिपती कदम (रा. कुरवली ता. इंदापूर) व जितेंद्र उत्तम रणवरे (रा. सणसर ता. इंदापूर) यांचा मृत्यू झाला.
याबाबत बरड पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार रात्री 10. वाजण्याच्या सुमारास फलटण- पुणे पालखी मार्गावर सुरभी हॉटेल व साधुबुवा मंगल कार्यालय राजुरी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर क्रमांक (श्प्– 42– Aइ– 6518) हा ऊस घेऊन उपळवे (ता. फलटण) येथील स्वराज साखर कारखान्याकडे निघाला होता. तर फलटणहून नातेपुतेच्या दिशेने चाललेली इंडिका कार क्रमांक (श्प्– 42 – A – 2482) या गाडीचे चालक यांनी विरुद्ध बाजूला जाऊन राजुरी येथील सुरभी हॉटेल समोर ट्रक्टरला जोरदार धडक दिली. त्यामध्ये झालेल्या अपघातात मोहन महिपती कदम (रा. कुरवली ता. इंदापूर) व जितेंद्र उत्तम रणवरे (रा. सणसर ता. इंदापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले असता उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची तक्रार तेजस विष्णू यादव राजुरी (ता. फलटण) यांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.