प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (ईस्कॉन) तर्फे सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे सरकारी नियमांचे पालन करून ठराविक भक्तांच्या आणि ब्रह्मचाऱयांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पहाटे 4.30 वाजता मंगलारती, 7.30 वाजता श्रं=गार दर्शन, 7.40 वाजता गुरुपूजा, 8 वाजता श्रीमद्भागवत कथाकथन आणि सकाळी 9 वाजता ईस्कॉन बेळगावचे अध्यक्ष प.पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे विशेष प्रवचन झाले.
याप्रसंगी बोलताना भक्तीरसामृत स्वामी म्हणाले की,’ ईस्कॉनच्या वर्षभराच्या कार्यक्रमातील आजचा कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा उत्सव असतो. त्याचे कारण आजचा दिवस हा भगवंताचा जन्मदिन म्हणजे प्रकट दिन म्हणून साजरा होतो. भगवंताच्या अनेक अवतारांपैकी प्रमुख अवतार म्हणजे श्रीकृष्ण हा होय. ईस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या मते भगवंताचा जन्म होत नाही. ज्याप्रमाणे सूर्य एकाच ठिकाणी असतो, पण त्याचा रोज सूर्योदय होतो तसेच भगवंताच्या बाबतीतसुद्धा म्हणता येईल. श्रीकृष्ण भगवंत भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात सांगतात की, मी जेव्हा प्रकट होतो तेव्हा अंतरंगात शक्तीने प्रकट होतो.
गीतेच्या 36 व्या श्लोकात सांगतात की, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते व अधर्माची वृद्धी होते, तेव्हा भगवंत प्रकट होतात. असुरांचा नाश करण्यासाठी आणि साधू-संतांचे व भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवान प्रकट होतात. 34 व्या श्लोकानुसार ब्रह्माजींची प्रार्थना ऐकून पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी श्रीकृष्ण जन्म घेतात. तर 35 व्या श्लोकानुसार काही लोकांच्या मते वेगवेगळय़ा क्लेशांनी पीडित असलेल्या लोकांचा क्लेश नाहीसा करण्यासाठी भगवंत भक्तीमार्ग घेऊन येतात. श्रवण, कीर्तन, अर्चना हेच भक्तीमार्गाचे प्रकार आहेत, असे भगवंत म्हणतात. सर्वांना भक्तीचा मार्ग दर्शविण्यासाठी, षड्रिपूंचे निर्मूलन करण्यासाठी भगवंत अवतरित होतात, असे म्हटले जाते. भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंत मानव रूपात प्रकट झाले आहेत. कारण मनुष्य त्यांना ठीकपणे समजून घेऊ शकतील. भगवंतांनी पाच हजार वर्षांपूर्वी मथुरा वृंदावन येथे जन्म घेतला, असेही भक्तिरसामृत महाराज यांनी सांगितले.
दुपारनंतर महाआरती आणि भक्तांच्यावतीने अभिषेक करण्यात आला. रात्री पुन्हा महाराजांचे ऑनलाईन प्रवचन झाले. त्यानंतर मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा पार पडला.
मंगळवारचे कार्यक्रम
जन्माष्टमीच्या दुसऱया दिवशी ईस्कॉनचे संस्थापक एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन असल्याने तो ईस्कॉनमध्ये मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. यावषी प्रभुपाद यांचा 125 वा आविर्भाव दिन असल्याने त्याला विशेष महत्त्व असून जगभरात तो मोठय़ा उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या महत्त्वाच्या घटनेचे औचित्य साधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका विशेष नाण्याचे विमोचन करणार आहेत. त्याचबरोबर बेळगाव ईस्कॉनमध्येही फक्त मर्यादित भक्तांच्या उपस्थितीत मंगळवारी विविध कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.