प्रतिनिधी / कोल्हापूर
उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के समाधान करणार असल्याची ग्वाही, ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कायद्याच्या चौकटीत राहूनच पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी. पुनर्वसनापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळावा. प्रकल्पग्रस्तांना जमीन तातडीने द्यावी. प्रकल्पाला गेलेल्या जमिनीच्या बदल्यात सुपीक जमीन मिळावी. यांचा समावेश आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच, शुक्रवारी दि. १० प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन त्याचा परिपूर्ण अहवाल तयार करण्याच्या सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. तसेच पंधरवड्यात याप्रश्नी पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीला आमदार राजेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी सौ. वसुंधरा बारवे आदी उपस्थित होते.