३६ हजाराहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान उत्तर कर्नाटकाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. उत्तर कर्नाटकात पूर परिस्थिती सोमवारीही गंभीर राहिली. सोमवारी मदत व बचाव कार्य सुरूच होते. गुलबर्गा, विजापूर, यादगीर आणि रायचूर जिल्ह्यातील अद्यापही अनेक गावे पूरात बाधित आहेत. आतापर्यंत ३६ हजारपेक्षा जास्त लोकांना वाचविण्यात आले आहे आणि त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सेना आणि एनडीआरएफचे जवान पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत.
भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडल्याने आणि तेथील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे भीमा नदी १४ ऑक्टोबरपासून भरून वाहत आहे. भीमा नदी ही कृष्णाची उपनदी आहे. भीमानाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गुलबर्गा, विजापूर, यादगीर आणि रायचूरमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. परिसरात अधून मधून मुसळधार पाऊस पडत असल्याने मदत व बचाव कार्यात अडथळा येत आहे.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या (केएसएनडीसी)अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार जिल्ह्यांतील गावे सर्वात जास्त पुरबाधित आहेत. तसेच तेथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आतापर्यंत ३६,२९० नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १७४ मदत शिबिरे उघडली असून तेथे २८,००७ लोक राहत आहेत.